शहरं
Join us  
Trending Stories
1
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
2
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
3
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
4
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
5
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
6
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
7
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
8
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
9
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
10
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
11
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
12
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल
13
४०० इमारतींवर होर्डिंग्जचा भार; स्ट्रक्चरल ऑडिटकडे महापालिका लक्ष देणार काय? 
14
भावेशच्या एजन्सीचे लाभार्थी कोण? बँक खात्याची पाळेमुळे खणणार, २६ मेपर्यंत पोलिस कोठडी
15
मतदारराजा तुझ्याचसाठी सर्व तयारी; मतदान प्रक्रियेसाठी शहर जिल्हा प्रशासन सज्ज
16
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
17
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
18
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
19
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
20
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 

निवडणूक आयोग कोणाचा? भारताचा की भाजपाचा?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2019 4:31 AM

शेषन यांच्या काळात निवडणूक आयोगाचा दरारा होता. म्हणून सारेच काळजी घ्यायचे. आता विरोधकांनीच तेवढी काळजी घ्यायची आहे. भाजपच्या पुढाऱ्यांनी त्याला वाकुल्या दाखवत सारे करायचे आहे. आयोगच असा पक्षांध झाला, तर दाद कुणाकडे मागायची?

या देशात निवडणुका आयोजित करण्याची संवैधानिक जबाबदारी असलेला आपला निवडणूक आयोग प्रत्यक्षात आहे कुणाचा? भारताचा की भाजपचा? सध्याची निवडणूक सुरू होण्याआधीच त्याचा कल व सूत्रे शासकीय यंत्रणांकडे न राहता अमित शहांच्या भाजपकडे गेलेली दिसली. तसाही सत्ताग्रहणापासून देशातील सगळ्या संवैधानिक संस्थांचे संघीकरण करण्याचा उद्योग मोदींकडून सुरू होताच. त्यातील नवी आहुती निवडणूक आयोगाची आहे. त्याने दिलेले सगळे निर्णय भाजपला अनुकूल आणि काँग्रेससह इतर पक्षांना प्रतिकूल असलेले दिसले. या आयोगाचे निवडणुकांवर, त्यातील प्रचारावर, त्याविषयी बातम्या देणाऱ्या प्रसारमाध्यमांवर, त्यात गावोगाव झालेल्या पैशाच्या वाटपावर आणि सर्वच पक्षांच्या (त्यातही भाजपच्या) उमेदवारांनी-नेत्यांनी उधळलेल्या बेलगाम व बेफामच नव्हे, तर बेताल आणि प्रसंगी हिंस्र उद्गारांवर जराही नियंत्रण नसल्याचे दिसले. ज्यांच्यावर असे निर्बंध त्याने आणले ते बहुतेक पक्ष व नेते भाजपेतर होते आणि ज्यांच्याकडे आयोगाने उद्दामपणे दुर्लक्ष केले किंवा दुर्लक्ष करून प्रोत्साहन दिले, ते पुढारी व कार्यकर्ते भाजपचे होते.

थम धर्माचा वापर झाला. मग मंदिराचा मुद्दा आणला गेला. गोहत्येचा प्रश्न पुढे केला गेला. तलाकबंदी आली. अल्पसंख्याकांवरील हल्ले आले. दलितांना भाजपच्या लोकांनी केलेली मारहाण आली. पण हे सारे करणारे निवडणूक आयोगाला दिसले नाही. मोदींना व शहांना साधे फुसके इशारे दिले, पण मायावती आणि आझमखान यांच्यावर भाषणबंदी आणली गेली. पंतप्रधानांच्या हेलिकॉप्टरची तपासणी करणारा अधिकारी बडतर्फ झाला. पण हा आयोग हलला नाही. शत्रूंशी लढताना हौतात्म्य पत्करलेले हेमंत करकरे ‘माझ्या शापाने मेले’ असे आचरट उद्गार काढणारी प्रज्ञासिंह ठाकूर, ‘आमच्या नेत्यांवर टीका करणाऱ्यांचे हात तोडू’ म्हणणारे भाजपचे मध्य प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष सैती, राहुल गांधींविषयी हिंसक भाषा करणाऱ्या पंकजा मुंडे या आयोगाला दिसल्या नाहीत.
शेषन यांच्या काळात निवडणूक आयोगाचा दरारा व धास्ती होती. आयोग अंगावर येऊ नये, म्हणून सारेच काळजी घ्यायचे. आता विरोधकांनीच तेवढी काळजी घ्यायची आहे. भाजपच्या पुढाऱ्यांनी त्याला वाकुल्या दाखवत सारे करायचे आहे. विरोधकांवर तत्काळ खटले दाखल झाले. त्यांच्याविरुद्ध पोलिसात तक्रारी झाल्या. मात्र भाजपवाले निवांत राहिले. त्यांच्या प्रत्येकच कृत्याकडे या आयोगाने पाहून न पाहिल्यासारखे केले. मोदींनी ममता बॅनर्जींबाबत अपशब्द वापरले, भाजपच्या ट्रोलर्सनी प्रियांका गांधींवर अतिशय गलिच्छ टीका केली. मोदींनी विरोधकांना पाकिस्तानवादी किंवा देशद्रोही म्हटले. मात्र पंतप्रधान ज्यांना पाकिस्तानवादी म्हणतात त्यांना आपण निवडणूक कशी लढवू दिली, हा साधा, पण लाज वाटायला लावणारा प्रश्नही या आयोगाला पडला नाही.
सैनिकांच्या बलिदानाचा मुद्दा काढून त्यांच्यासाठी मते देण्याचे आवाहन मोदींनी केले किंवा मत देण्यासाठी जाताना त्यांनी मिरवणूक काढली, पण त्याची फक्त माहिती आयोगाने मागवली. गुजरातेत शेकडो कोटी रुपये, सोने व दागिने अवैध स्वरूपात या काळात सापडले. पण आयोगाने त्याकडे पाहिले नाही. ऐन निवडणुकीत आसामातील नागरिकांना देशाबाहेर काढण्याची धमकी अमित शहांनी दिली. पण तीही या आयोगाला दखलपात्र वाटली नाही. मोदींच्या सत्ताकाळात नियोजन आयोगाची माती झाली, सर्वोच्च न्यायालयाची प्रतिष्ठा गेली, सॉलिसिटर जनरल हा सरकारचा न राहता भाजपचा वकील बनला. विद्यापीठ आयोगाची स्वायत्तता गेली आणि निवडणुकीच्या राजकारणावर जनतेचा विश्वास राहू नये, अशी स्थिती निर्माण झाली. देशातील २१ राजकीय पक्षांनी एकत्र येऊन मतदान यंत्रांची तपासणी करण्याची केलेली विनंतीही या आयोगाने मनावर घेतली नाही. मोदी म्हणतील तसे आणि शहा सांगतील तसे हा आयोग करीत राहिला. आरंभी पक्ष व नेते गरीब असत, त्या वेळी फारसे गैरप्रकार घडत नसत. ते घडू लागले तेव्हा शेषन आले. आता पक्ष श्रीमंत, उमेदवार करोडपती, राजकारण धर्मांध व नेते जात्यंध! अशा वेळी देशाला योग्य दिशा देणारा निवडणूक आयोग असावा की त्यानेही पक्षांधच व्हावे?

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शहाRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसSamajwadi Partyसमाजवादी पार्टीBahujan Samaj Partyबहुजन समाज पार्टीPankaja Mundeपंकजा मुंडे