धुळे : तालुक्यात धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांनी दर्जोन्नती करून मंजूर केलेल्या नगाव बिलाडी रस्त्याचे गुरुवारी खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी केलेले भूमिपूजन म्हणजे आमदारांनी मंजूर करून आणलेल्या कामांचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप धुळे तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष भगवान पाटील, कार्याध्यक्ष अशोक सुडके यांनी एका पत्रकान्वये केला आहे.
पत्रकात पुढे म्हटले आहे की, तालुक्यातील बिलाडी, जापी येथील ग्रामस्थांच्या मागणीमुळे आमदार कुणाल पाटील यांनी नगाव ते बिलाडी ते जापी रस्त्याच्या सुधारणा करण्यासाठी पाच वर्षे जिल्हा परिषद काँग्रेसच्या ताब्यात असताना अनेकदा निधीची तरतूद केली होती. मात्र मर्यादित निधी आणि रस्त्याची लांबी जास्त यामुळे एकाचवेळी पूर्ण रस्त्याची सुधारणा होत नव्हती. हा रस्ता जिल्हा परिषदेच्या अंतर्गत असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाचा निधी उपलब्ध होणे शक्यच नव्हते. बिलाडी, जापी, शिरडाने या गावातील प्रमुख कार्यकर्त्यांनी केलेल्या मागणीनुसार नगाव - बिलाडी - जापी - शिरडाने - नावरा - नावरी - ते रामा - १३ हा इतर जिल्हा मार्ग क्रमांक ५५ आणि तालुक्यातील इतर सात ग्रामीण मार्ग, इतर जिल्हा मार्ग रस्ते आ. कुणाल बाबा पाटील यांनी जानेवारी २०२०मध्ये सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे स्वतः जाऊन प्रमुख जिल्हा मार्गमध्ये दर्जोन्नती करण्याबाबत आदेश करून घेतले त्यानुसार नगाव बिलाडी जापी शिरडाने नावरा नावरी ते रामा-१३ हा रस्ता आता प्रमुख जिल्हा मार्ग -५३ झाला आहे. मार्च २०२०च्या बजेटमध्ये या रस्त्यासाठी एक कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली तर आर्थिक वर्ष २०२०-२१ साठी ९० लक्ष रुपयांची तरतूद करण्यात आली.
राज्याचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर राज्यात कोरोना महामारी पसरली, त्यामुळे सर्वच कामांवर बंधने आली, त्यामुळे मागच्या वर्षी मंजूर झालेल्या या कामाचे मार्च २०२१ मध्ये टेंडर झाले आणि आता कार्यारंभ आदेश निघाले आहेत. नगाव गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य ज्यांनी या भूमिपूजन कार्यक्रमाचा घाट घातला. त्यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आपल्या पंचक्रोशीतील गावांसाठी कोणता निधी आणला हे आधी जनतेला सांगितले पाहिजे, असेही पत्रकात म्हटले आहे.