ग्रामीण भागात धूमधडाक्यात लग्न सोहळे सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:33 AM2021-03-08T04:33:34+5:302021-03-08T04:33:34+5:30
राज्यात आता कोरोना पुन्हा फोफावला आहे. याचे गांभीर्य लक्षात घेत राज्य शासनाने लग्न सोहळे व गर्दीच्या कार्यक्रमांवर निर्बंध लावले ...
राज्यात आता कोरोना पुन्हा फोफावला आहे. याचे गांभीर्य लक्षात घेत राज्य शासनाने लग्न सोहळे व गर्दीच्या कार्यक्रमांवर निर्बंध लावले असून ५० पेक्षा जास्त व्यक्ती असू नयेत, असे आदेश काढले आहेत. त्यानुसार, जिल्हाधिकाऱ्यांनीही जिल्ह्यासाठी आदेश काढले आहेत. मात्र या या निर्बंधाना ग्रामीण भागात बगल देत लग्न सोहळे धडाक्यात सुरूच असल्याचे दिसून येत आहे. यात ५० पेक्षा जास्त व्यक्ती असू नये असे स्पष्ट आदेश असतानाही काही ठिकाणी शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत हे लग्न सोहळे आटोपले जात आहेत. अशात मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार यात शंका नसून जिल्ह्यात पुन्हा कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. ही बाब नक्कीच गंभीर आहे. मात्र होत असलेली कमाई हातून जाऊ नये यासाठी मंगल कार्यालय व मंडपवालेही वेगवेगळी शक्कल लढवून लग्नसोहळे आटोपून घेत असल्याचे बोलले जात आहे.
गर्दी होऊन कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नगर पालिका व संबंधित विभाग प्रमुखांनी त्यांच्या अधिकार क्षेत्रातील मंगल कार्यालय, लॉन, कोचिंग क्लासेस आदी गर्दी होणाऱ्या ठिकाणी अचानक भेट देऊन तपासणी करावयाची आहे. तसेच मर्यादेपेक्षा जास्त व्यक्ती आढळल्यास उचित दंड आकारावा किंवा कारवाई करावी, असे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात नमूद आहे. मात्र जिल्हा व शहरात असे होत नसल्याने लग्न सोहळे धडाक्यात आटोपले जात असल्याचे चित्र आहे.