वाढत्या तापमानाने रस्ते ओस 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 11:51 IST2019-03-31T11:48:18+5:302019-03-31T11:51:15+5:30

पारा ४१.८ अंशावर : भारनियमनाचाही फटका, खबरदारीचे आवाहन

Road dew at increasing temperature | वाढत्या तापमानाने रस्ते ओस 

वाढत्या तापमानाने रस्ते ओस 

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे :  उष्णतेच्या लाटेत सध्या धुळेकर होरपळत असून ‘मार्च हिट’ चा अनुभव घेत आहेत. यंदाच्या मोसमातील सर्वोच्च तापमान शुक्रवारी ४२़०२ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले होते. तर शनिवारी तापमानात काहीशी घट होऊन ४१़८ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदविण्यात आले़ चार-पाच दिवसांपासून कडाका कायम असून तापमानमुळे दैनंदिन जनजीवनावर परिणाम झाला आहे. 
यंदा फेब्रुवारी महिन्यापासूनच उन्हाची तीव्रता वाढली असून मार्च महिन्यात तापमानाने चाळिशी ओलांडली होती़ धुळ्यात दरवर्षी कमाल तापमान ४१ ते ४२ अंशांपर्यंत जात असते़, त्यामुळे राज्यातील उष्ण शहरांच्या यादीत धुळ्याचा समावेश असतो़  परंतु, यावर्षी फेब्रुवारीपासूनच उन्हाची तीव्रता जाणवू लागली होती. तर चालू मार्च महिन्यातच तापमानाने ‘चाळिशी’ ओलांडली आहे़ 
दैनंदिन जनजीवन विस्कळीत
उष्णतेच्या लाटेमुळे धुळ्यातील रस्ते दुपारी ओस पडत असून शुकशुकाट जाणवतो. शीतपेयांना मागणी वाढली असून टोप्या, उपरणे, रुमाल, गॉगल्सचा वापर केल्याशिवाय घराबाहेर निघणे अशक्य होत आहे़  अनेक व्यावसायिक दुपारच्या वेळी दुकाने बंद ठेवत आहेत़ त्यातच नदी, तलाव, कूपनलिका, विहिरी आटल्याने पाणीटंचाईचा सामना धुळेकरांना करावा लागत आहे़ भरउन्हात पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे़  जिल्हा प्रशासनाने ाापमान वाढीचा इशारा दिला आहे़  
आरोग्याच्या तक्रारींमध्ये वाढ 
उष्णतेच्या लाटेचा तडाखा बसत असल्याने आरोग्याच्या तक्रारी वाढल्या आहेत़ तीव्र उन्हामुळे अस्वस्थपणा, थकवा, शरीर तापणे, अंगदुखी, डोकेदुखी, मळमळ ही लक्षणे आढळून येत असून मनपा प्रशासनाने खबरदारीचे आवाहन केले आहे़ रखरखत्या उन्हामुळे अंगाची काहिली होत असून ‘मार्च हॉट’मुळे नागरिक अक्षरश: हैराण झाले आहेत़ त्यामुळे दुपारी १२ वाजेपासूनच वर्दळीचे रस्ते ओस पडत आहे़ हवामान खात्याने उत्तर मध्य महाराष्ट्रात उष्णतेची लाट येणार असल्याचा इशारा दिला होता. १६ मार्चपासून तापमानाने उच्चांक गाठल्याने धुळेकरांना चटके बसत आहे़ त्यामुळे थंडगार पाणी, आईस्क्रिम पार्लर, रसवंती, शितपेयांची दुकाने, लिंबूपाणी, गोला या शितपदार्थांना मागणी वाढली आहे़ सकाळपासूनच उन्हाची दाहकता जाणवत असून सायंकाळी उशिरापर्यंत झळा जाणवत आहेत़ नागरिक शक्य तेवढी कामे लवकर आटोपून घराकडे परतत असल्याने दुपारी १२ ते ५ यावेळेत वर्दळ मंदावत आहे. त्यामुळे अघोषित संचारबंदीसारखी स्थिती दिसते. ‘मे हीट’चा अनुभव मार्चमध्येच येत आहे.  
भारनियमाचे संकट 
उन्हाच्या झळा व विजेचे भारनियमन असा दुहेरी त्रास सध्या नागरिकांना सहन करावा लागत आहे़ दुपारी विश्रांतीच्या वेळी अचानक वीज गुल होत असल्याने पंखे, कुलर, एसी असूनही झोपेचे खोबरे होत असल्याने नागरिकांना मोठाच मनस्ताप सहन करावा लागत आहे़ 
उन्हाळ्यात होणारा उष्माघात टाळण्यासाठी नागरिकांनी बाहेर जातांना गॉगल, छत्री, टोपी, बुट व चप्पलचा वापर करावा, तसेच प्रवास करतांना पाण्याची बॉटल सोबत ठेवावी, आहारात मासे, मटण, तेलकट पदार्थ, शिळे अन्न खाणे टाळावे़ 
-डॉ़बी़बी़ माळी , 
आरोग्य अधिकारी, महापालिका

Web Title: Road dew at increasing temperature

टॅग्स :Dhuleधुळे