दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आहे. अर्जमाघारीपर्यंत अनेक गावांच्या निवडणुका बिनविरोध झालेल्या असल्या तरी जिल्ह्यातील अनेक मोठ्या गावांमधील लढतींकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे.
जिल्ह्यात सर्वाधिक ग्रामपंचायतीच्या निवडणुका या धुळे तालुक्यात होत असून, या तालुक्यात बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायतींची संख्याही कमी आहे. त्यामुळे या तालुक्यात होणाऱ्या लढती या चुरशीच्या होण्याचे संकेत आहेत. धुळे तालुक्यात सोनगीर, कापडणे, नेर, अजंग-कासविहीर, गोंदूर, चौगाव-हिंगणे, निमडाळे, शिरूड, सडगाव-हेंकळवाडी, या मोठ्या ग्रामपंचायतींच्या लढतींकडे तालुक्याचे लक्ष लागून राहिलेले आहे. या गावांमध्ये मातब्बर उमेदवार असल्याने, निवडणुकीत कोण बाजी मारते याकडे तालुक्याचे लक्ष लागून राहिलेले आहे.
तसेच शिंदखेडा तालुक्यातील खलाणे, कर्ले, सुलवाडे, हातनूर, बेटावद, धमाणे, विरदेल या गावांच्या लढती चुरशीच्या होण्याचे संकेत आहेत. साक्री तालुक्यातील निजामपूर, जैताणे, दुसाणे, म्हसदी, दातर्ती, हट्टी खुर्द या; तर शिरपूर तालुक्यातील दहिवदसह अनेक मोठ्या ग्रामपंचायतीच्य निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
बहुतांश ठिकाणी दोन पॅनलमध्ये सरळ-सरळ लढत आहे; त्यामुळे मतदानाच्या टक्केवारीवरच जय-पराजयाचे गणित अवलंबून राहणार आहे; कारण ग्रामीण भागात एका वॉर्डामध्ये मतदारांची संख्या तुलनेने कमी असते. असलेल्या संख्येतून जास्तीत जास्त मतदान होणे गरजेचे आहे.
अनेकांनी आतापासूनच दावे-प्रतिदावे केलेले असले तरी मतदारांनी कोणाच्या पारड्यात आपले मत टाकले आहे, हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. मात्र त्याची उत्सुकता मतदानाच्या दिवसापासूनच लागलेली आहे.