शेतकरी ओढतात बैलगाडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2019 10:45 PM2019-11-09T22:45:05+5:302019-11-09T22:45:37+5:30
निमगुळ येथे कसरत : पुलावरून वाहणारे पाणी, शेवाळ धोकेदायक
विंचूर - धुळे तालुक्यातील निमगुळ येथील शेतकरी बैलांऐवजी स्वत: नदीपात्रातून शेतमालाने भरलेली गाडी ओढतात. अशी ही कसरत त्यांना रोजच करावी लागत आहे. कारण नदीला सध्या गुडघाभर पाणी वाहत असून पूल शेवाळलेला आहे. बैल गाडीला जुंपल्यास खूर घसरून त्यांचा पाय मोडण्याची भीती असते. अशा घटना घडून तीन गुरे दगावल्याने अशा पद्धतीने गाडी नेऊन शेतमालाची वाहतूक केली जात आहे.
नदी पात्र ओलांडून मग पुन्हा गाडीला बैल जुंपून शेताकडे जाण्यासाठी कसरत करावी लागत आहे. यंदा जास्त पाऊस झाल्याने निमगुळ गावाच्या बोरी नदीवरील फरशी पुलावर नियमित गुडघ्याच्यावर पाणी वाहत आहे. तसेच पाऊस झाल्यास नदी अचानक दुथडी भरून वाहते. फरशीपूल मोठ्या प्रमाणात शेवाळल्याने निसरडा झाला आहे. मध्य भागी मोठा खड्डाही पडला असून तो माणसांना नीट जाणवतो मात्र गुरांच्या लक्षात येत नसल्याने अनेकदा पाय मुरगळून बैल व अन्य गुरे खाली पाण्यात पडल्याचा अनुभव शेतकरी सांगतात.
फरशीच्या वरील बाजुस वाळू साचली आहे. ५०० फूट लांबीच्या फरशी पुलास केवळ ८ पाईप असून ते कचरा, वाळू साचल्याने बंद झाले आहेत. त्यामुळे पाणी पुलावरून वाहते. निमगुळ गावची ४० टक्क्यापेक्षा जास्त लोकसंख्या नदीच्या पलीकडे राहते. दोघांची शेतजमिनी अलीकडे-पलीकडे आहेत सुमारे ७०० हेक्टर जमीन नदीच्या उजव्या तिरावर आहे. ते शेतकरी सध्या पावसाने खराब झालेली पिके व कापूस आवरण्यासाठी धडपड करत आहेत. नदी सुरक्षित पार करण्यासाठी जाणकारांनी दोरखंडही बांधला. मात्र गाडी व इतर जनावरे शेताकडे नेतांना जीवघेणी कसरत गेल्या तीन महिन्यांपासून करावी लागते. तरूण पैलवान मदत करतात. महिलांना देखील गाडीवर बसवून नदी ओलांडावी लागते. सर्व बैलगाडी धारकांना शेतात जाताना गाडी ओढण्याचा त्रास होतो. प्रचंड शक्ती एकवटून सदर कापुस व खराब झालेले भुईमूग मका आदी पिके गाडीवर आणणे गरजेचे असल्याने सध्या तरी दुसरा पर्याय नसल्याचे निमगुळच्या ग्रामस्थांनी सांगितले.
उंच पुलाची मागणी अद्याप प्र्रलंबित
सध्या येथील छोट्या फरशी पुलावरून गुडघाभर पाणी वाहत असून जीवघेणी खड्डे असल्याने तेथील लहू मराठे, भिकन चव्हाण व पैलवान सतीष मोरे हे व अजून काही शेतकरी जीवाची बाजी लावून नदीतून गाडी मेहनतीने ओढतात. त्याशिवाय शेतातून माल आणणे अनेकांना शक्यच नाही. सदर ठिकाणी ऊंच पुल बाधण्याची मागणी नागरिकांनी आधीच केलीय परिसरातील शेतक?्यांची कापूस वेचणी सूरू असता अशी फरफट होत आहे पावसाने आधीच मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे प्रशासनाने याची गंभीरपणे दखल घेऊन शेतकऱ्यांची या संकटातून लवकर सुटका करावी, अशी मागणी केली जात आहे.