स्टेटसच्या कारणावरून रक्ताने माखला मांडव; हल्ल्यात बाप-लेकासह तिघांचा झाला करुण अंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 07:29 IST2026-02-20T07:28:30+5:302026-02-20T07:29:42+5:30
Dhule Crime: पिंपळनेर येथील विजयगिरी गोसावी यांची मुलगी रोहिणी हिचा विवाह सोनगड (गुजरात) येथील रणवीर गोसावी याच्याशी निश्चित झाला होता. १९ आणि २० फेब्रुवारी रोजी पिंपळनेर येथे साखरपुडा व हळदीचा कार्यक्रम आयोजित होता.

स्टेटसच्या कारणावरून रक्ताने माखला मांडव; हल्ल्यात बाप-लेकासह तिघांचा झाला करुण अंत
पिंपळनेर (धुळे): ज्या मांडवात सनई-चौघड्यांचे सूर घुमणार होते आणि दोन कुटुंबे रेशीमगाठीत अडकणार होती, तिथेच क्षुल्लक वादातून रक्ताचा सडा पडला. व्हॉट्सॲप स्टेटसच्या वादाचे पर्यावसान हाणामारीत होऊन नवरदेवाकडील नातेवाईकांनी केलेल्या हल्ल्यात साक्री येथील बाप-लेकासह तिघांचा करुण अंत झाला.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
पिंपळनेर येथील विजयगिरी गोसावी यांची मुलगी रोहिणी हिचा विवाह सोनगड (गुजरात) येथील रणवीर गोसावी याच्याशी निश्चित झाला होता. १९ आणि २० फेब्रुवारी रोजी पिंपळनेर येथे साखरपुडा व हळदीचा कार्यक्रम आयोजित होता. मात्र, लग्नापूर्वीच नवरदेवाकडील काही तरुणांनी सोशल मीडियावर "तुमचे अस्तित्व संपवू" अशा आशयाचे चिथावणीखोर स्टेटस आणि रील्स अपलोड केले होते. गुरुवारी सकाळी साखरपुड्याच्या कार्यक्रमात या स्टेटसवरून दोन्ही पक्षांत वाद झाला. यात सुरेश गोसावी (५०) आणि त्यांचा मुलगा साहिल (३०) यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच देवेंद्र पवार (३०) या तरुणालाही आपले प्राण गमवावे लागले.
आरोपींच्या घाटात आवळल्या मुसक्या
घटनेनंतर आरोपींनी कारने गुजरातच्या दिशेने पळ काढला होता. मात्र, पोलिसांनी तत्परता दाखवत नाकाबंदी केली आणि गुजरात सीमेवरील ओटाबारी घाटात पाठलाग करून तिघांना अटक केली. यात कांतीलाल गोसावी (४२), जसवंत गोसावी (३६) यांचा समावेश आहे. एका सोशल मीडिया स्टेटससाठी तीन संसार उद्ध्वस्त झाल्यानेतीव्र संताप व्यक्त होत आहे.