वाहतूक समस्येबाबत बैठकीत झाली चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:23 IST2021-07-18T04:23:41+5:302021-07-18T04:23:41+5:30
उमरगा : शहरातील बाजारपेठेत होत असलेली गर्दी, तसेच मुख्य रस्त्यावर, शिवाजी चौक, इंदिरा चौक, आरोग्यनगरीतील वाहन पार्किंग व हातगाडे ...

वाहतूक समस्येबाबत बैठकीत झाली चर्चा
उमरगा : शहरातील बाजारपेठेत होत असलेली गर्दी, तसेच मुख्य रस्त्यावर, शिवाजी चौक, इंदिरा चौक, आरोग्यनगरीतील वाहन पार्किंग व हातगाडे यांच्यामुळे वाहतुकीची कोंडी होऊन अपघाताचे प्रमाण वाढले आहे. या अनुषंगाने आ.ज्ञानराज चौगुले यांनी पालिका व पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन उपाययोजनांबाबत चर्चा केली.
यावेळी आ.चौगुले यांनी उमरगा शहरात ‘पे ॲण्ड पार्क’ ही संकल्पना राबविण्यासाठी रितसर प्रस्ताव तयार करून, जिल्हाधिकारी यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविणे, पोलीस स्टेशनच्या संरक्षक भिंतीलगत व आरोग्यनगरीमध्ये प्रवेश करतेवेळी पूर्व बाजूच्या कोपऱ्यात, तसेच बस स्थानक प्रवेशद्वाराजवळील खुल्या जागेत ही ‘पे ॲण्ड पार्क’ची सुविधा केल्यास आरोग्यनगर, शिवाजी चौक व इंदिरा चौक येथील वाहतुकीचा होणारा खोळंबा दूर होईल. मुख्य रस्त्यावरील फळगाडे व हातगाडे संबंधित दुकानापासून पाच फूट अंतरावर असल्यास व दुकानासमोर बेशिस्त पार्किंगला मज्जाव केल्यास वाहतूक व्यवस्था सुरळीत होऊ शकते, अशा सूचना केल्या.
आरोग्यनगरीसह शहरातील इतर गर्दीच्या ठिकाणी एकतर्फी वाहतूक करणे, रिक्षाचालकांना वाहन पार्किंगला शिस्त लावणे, याबाबतही बैठकीत चर्चा झाली. या सर्व बाबींची पूर्तता होण्यासाठी न.प.च्या बैठकीत प्रस्ताव तयार करून, मंजुरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांक़डे सादर करावा, अशा सूचना आ.चौगुले यांनी यावेळी केल्या. बैठकीस पोलीस निरीक्षक मुकुंद आघाव, मुख्याधिकारी रामकृष्ण जाधवर, नगर अभियंता तुळशीदास वऱ्हाडे आदी उपस्थित होते.