सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद रेल्वेमार्ग पुन्हा अडगळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:25 IST2021-07-17T04:25:48+5:302021-07-17T04:25:48+5:30
उस्मानाबाद : तब्बल ९०४ कोटी रुपये खर्चाचा व देशभरातील भाविकांच्या आस्थेचा मार्ग असलेला सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद रेल्वेमार्ग पुन्हा अडगळीत पडण्याची चिन्हे ...

सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद रेल्वेमार्ग पुन्हा अडगळीत
उस्मानाबाद : तब्बल ९०४ कोटी रुपये खर्चाचा व देशभरातील भाविकांच्या आस्थेचा मार्ग असलेला सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद रेल्वेमार्ग पुन्हा अडगळीत पडण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. केंद्र-राज्य भागीदारीत असलेल्या या प्रकल्पाला राज्य शासनाने यावेळीही ठेंगा दाखविला आहे.
सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद हा ८४.४४ किमी लांबीचा मार्ग असून, यासाठी ९०४.९२ कोटी रुपये खर्च प्रस्तावित आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४मध्ये हा रेल्वेमार्ग मंजूर करून तो पूर्णत्वास नेण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार मंजुरी मिळाली व २०१९ मध्ये भूमिपूजनही करण्यात आले आहे. मात्र, पुरेशी आर्थिक तरतूद या मार्गासाठी होत नाहीये. प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी राज्यातील इतर महत्त्वाच्या प्रकल्पाप्रमाणे खर्चाचा ५० टक्के हिस्सा उचलण्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१९ मध्येच मान्य केले होते. राज्य सरकारची अधिकृत सहमतीही तेव्हा रेल्वे बोर्डास कळविली होती. मात्र, या सहमतीनंतर पुढे राज्याकडून कसल्याही हालचाली झाल्या नाहीत. दरम्यान, केंद्र सरकारने २०२१-२२ या आर्थिक वर्षात या प्रकल्पासाठी २२ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. प्रकल्पाचे काम सुरळीत सुरू रहावे, यासाठी समप्रमाणातील राज्याच्या हिस्स्याची तरतूद करण्याबाबत रेल्वे विभागाचे मुख्य अभियंत्यांनी नुकतीच प्रधान सचिवांकडे मागणी केली आहे. एकिकडे रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षण व भूसंपादनाच्या कामाला सुरुवात झालेली असताना राज्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनातील पुरवणी मागण्यांमध्ये या प्रकल्पाचा साधा उल्लेखही नाही. परिणामी, हा प्रकल्प रेंगाळण्याची चिन्हे वाढली आहेत.
नकारात्मकता कायम...
भाजप-सेना युतीच्या काळात त्यांच्या सरकारने अर्धा खर्च उचलण्याची तयारी दर्शविली होती. तसेच अधिकृत पत्रही शासनाकडून रेल्वेला देण्यात आले होते. मात्र, यापूर्वीच्या अधिवेशनात राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद रेल्वेमार्ग संपूर्णतः केंद्र शासनाच्या आर्थिक सहभागाने होणार असल्याने राज्य शासनाने निधी देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे उत्तर सभागृहात देऊन या मार्गाविषयीची अनास्थाच प्रकट केली होती. त्यामुळे राज्य शासनाची या मार्गाविषयीची भूमिकाही यानिमित्ताने समोर आली आहे.
नाशिकला मिळते, मग इथे का नाही : आमदार पाटील
पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून पुणे-नाशिक रेल्वे मार्गासाठी १०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, सोलापूर-उस्मानाबाद रेल्वे मार्गाचा पुरवणी मागण्यांमध्ये साधा उल्लेखही नाही. या प्रकल्पाचे काम थांबू नये, यासाठी राज्य आकस्मिक निधीमधून तातडीने २२ कोटी उपलब्ध करून देण्यासाठी सर्व संबंधितांची व्हर्च्युअल बैठक घेऊन तुळजाभवानी देवीच्या लाखो भक्तांसह जिल्हावासीयांना न्याय द्यावा, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी पत्राद्वारे केली आहे.