बियाणाची खरेदी नऊ रुपये अन् बटाट्याची विक्री आठ रुपयांनी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:28 IST2021-02-08T04:28:53+5:302021-02-08T04:28:53+5:30
गतवर्षीच्या तुलनेत दर आले निम्यावर : कळंब तालुक्यातील बटाटे उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी बालाजी आडसूळ कळंब : कधी नाही ...

बियाणाची खरेदी नऊ रुपये अन् बटाट्याची विक्री आठ रुपयांनी !
गतवर्षीच्या तुलनेत दर आले निम्यावर : कळंब तालुक्यातील बटाटे उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी
बालाजी आडसूळ
कळंब : कधी नाही ते केळी पीक तोट्याचे ठरत असल्याचे स्पष्ट झाले असतानाच आता तेरणा काठावरील बटाट्याची शेतीही आतबट्ट्याची ठरत असल्याचे समोर आले आहे. बेणे आठ-नऊ रुपये किलोने मिळालेल्या शेतकऱ्यांच्या बटाट्यास किलोला सात-आठ रुपयांचा दर मिळत असल्याने आर्थिक कोंडी होत आहे. तालुक्यातील विविध भागांत शेतीचे नवप्रयोग केले जात आहेत. यात कुठे फळ पिकावर तर कुठे तरकारीवर भर दिला जात आहे. यापैकीच तेरणा काठावरील शेलगाव दिवाणे, दहिफळ, गौर, अवधूतवाडी, बारातेवाडी, सापनाई, हळदगाव, सौदंणा आदी भागात बटाट्याचे उत्पादन घेतले जाते. अलीकडे तेरणा काठावरील ही गावे बटाट्याचा बेल्ट म्हणून ओळखली जातात. पुणे जिल्ह्यातील मंचर येथून यासाठी बेणे आणले जाते. त्याची दिवाळीच्या सुमारास लागवड केली जाते. पुढे नव्वद दिवसांत पीक घेत काढणी केली जाते. यातून एकरी दहा टन उत्पादन तर लाखभर निव्वळ उत्पन्न अपेक्षित असते.
यंदा मात्र हे अर्थचक्र धोक्यात आले आहे. उत्पादन खर्चात नेहमीप्रमाणे वाढ झालेली असताना मिळणारा दर मात्र कमालीचा घटला आहे. यामुळे तेरणा काठावरील बटाटे उत्पादक शेतकरी हतबल झालेे आहेत. लखपती होणं तर दूरच; परंतु या शेतकऱ्यांच्या नशिबी पुन्हा ‘लाखाचे बारा हजार’ अशी स्थिती ओढवली आहे.
चौकट....
बेण्याचेही पैसै निघेनात
तालुक्यातील शेलगाव व परिसरातील काही गावांतील शेतकऱ्यांचे बटाटे लागवड करताना बेण्यासाठी गेलेले पैसेही निघत नसल्याचे दिसून येत आहे. यात सर्वाधिक लागवड केली जाणाऱ्या बीआर वाणाच्या बेण्याचा मंचर येथे आठ रुपये किलो दर आहे. यास चार रुपये वाहतूक खर्च येतो. एकरी सहा क्विंटलपेक्षा जास्त बेणे लागते. आता पीक हाती आल्यावर बेण्याचा खर्चही निघणे मुश्कील झाले आहे.
प्रतवारीनुसार दर, तोही अल्पच
दिवाळीच्या आगासमागास लावलेले बटाटे नव्वद दिवसांनंतर काढले जातात. याची आकारानुसार प्रतवारी केली जाते. यात मोठा, गोल व भुगी असा माल एक, दोन व तीन नंबर याप्रमाणे काढला जातो. सध्या यास एक नंबरला दहा, दोन नंबरला आठ रुपयांचा तर भुगीस चार-पाच रुपयांचा किलोला दर मिळत आहे. हा उत्पादन खर्चाच्या तुलनेत अल्प दर आहे, असे दहिफळ येथील प्रयोगशील शेतकरी प्रशांत भातलवंडे यांनी सांगितले.
शेलगावला लाखोंचा फटका
शेलगाव दिवाणे गावात शंभर एकरांच्या आसपास बटाट्याची लागवड होते. यंदाही अशीच स्थिती. एकरी साठ-सत्तर हजारांचा खर्च केला. मात्र, उत्पादनात घट झाली. आता आहे त्या मालालाही दर नाही. गतवर्षी पंधरा-सोळा रुपयांनी गेलेला माल यंदा आठ रुपयांनीही जात नाही. यामुळे हजार टन उत्पादन अपेक्षित असलेल्या शेलगावास लाखो रुपयांचा फटका बसला आहे. हाती लाखभर रुपये राहत असतात; परंतु यंदा खर्चही निघणे मुश्कील झाले असल्याचे शेतकरी विठ्ठल विष्णू दिवाणे यांनी सांगितले.