चार महिन्यात पुलाच्या भिंती पडल्या उघड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:22 IST2021-07-21T04:22:20+5:302021-07-21T04:22:20+5:30

रस्ताही उखडला : दगडी पिचिंग, भिंत उभारण्याकडे दुर्लक्ष तुळजापूर : तुळजापूर ते केशेगाव मार्गावर तुळजापूर (खु.) गावानजीक बांधकाम विभागाने ...

In four months the bridge walls collapsed and opened | चार महिन्यात पुलाच्या भिंती पडल्या उघड्या

चार महिन्यात पुलाच्या भिंती पडल्या उघड्या

रस्ताही उखडला : दगडी पिचिंग, भिंत उभारण्याकडे दुर्लक्ष

तुळजापूर : तुळजापूर ते केशेगाव मार्गावर तुळजापूर (खु.) गावानजीक बांधकाम विभागाने चार महिन्यांपूर्वी पूल उभारणीचे काम पूर्ण केले. मात्र, दगडी पिचिंग, सिमेंट भिंत उभारण्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे रविवारी झालेल्या पावसात या पुलाच्या भिंती उघड्या पडल्या असून, रस्ताही उखडला गेला आहे. यामुळे लाखो रुपये खर्चूनही परिपूर्ण काम झाले नसल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.

तुळजापूर (खुर्द) येथील नदीचा पूल हा तुळजापूरमार्गे मोर्डा, तडवळा, धारूर, केशेगाव, बामणी, बेंबळी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर साखर कारखाना या मार्गावर जाणाऱ्या वाहनांसाठी व नागरिकांसाठी प्रमुख वर्दळीचा आहे. हा पूल कमी उंचीचा असल्याने प्रत्येक पावसाळ्यात या पुलावरून पाणी वाहात होते. यामुळे तुळजापूरमार्गे मोर्डा, धारूर आदी गावांकडे जाणाऱ्या नागरिकांचा संपर्क तुटत होता. शिवाय, मागील दोन ते तीन वर्षांपासून पावसाने या पुलावर मोठा खड्डा पडला होता. त्यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डा बुजवून मलमपट्टी केली. परंतु, पूल खचत चालल्याने बांधकाम विभागाने या ठिकाणी नवीन पूल उभारणीचे काम हाती घेतले. यावर जवळपास दहा लाख रुपयांचा खर्च करण्यात आला. मात्र, पुलाच्या बाजुला दगडी पिचिंग केली नाही. तसेच सिमेंटची भिंतही उभारण्यात आली नाही. त्यामुळे पुलाचे काम होऊन तीन ते चार महिन्यांचा कालावधी लोटत असतानाच रविवारी रात्री झालेल्या पावसाने पुलाच्या चारही बाजूने पाणी घासून जाऊन रस्त्याची दुरवस्था झाली. शिवाय, पिचिंग नसल्याने पुलाच्या भिंतीही उघड्या पडल्या आहेत. यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेल्या कामाचे पितळ उघडे पडले आहे.

चौकट.......

बजेट कमी पडले

यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, पूर हानी निधीतून जवळपास दहा लाख रुपये खर्च करून या पुलाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. परंतु, बजेट कमी असल्यामुळे पिचिंग, सिमेंट भिंतीचे काम राहिले आहे. सदरील काम हे अंदाजपत्रकानुसार पूर्ण झालेले आहे.

फलक काढण्याचा प्रशासनाला विसर

पुलाचे काम पूर्ण होऊन तीन ते चार महिन्यांचा कालावधी लोटला. यानंतर मार्गावरून वाहतूकही सुरू झाली. परंतु, काम सुरू असताना वाहनचालकांची गैरसोय होऊ नये, यासाठी ‘रस्ता बंद’ असा लावलेला सूचना फलक बांधकाम विभागाने अजूनही हटविलेला नाही. यामुळे वाहनचालकांची दिशाभूल होत आहे.

190721\242620210719_083941.jpg

तुळजापुर फोटो

Web Title: In four months the bridge walls collapsed and opened