उस्मानाबाद : तालुक्यातील ढोकी केंद्रावर हरभरा घालून दोन महिने झाले तरी अनुदान मिळत नसल्याने संतापलेल्या शेतकऱ्यांनी आज दुपारी जिल्हा मार्केट फेडरेशनच्या कार्यालयाला कुलूप लावले़. यावेळी अनुदानाची मागणी करीत प्रशासनाच्या निष्क्रीय कारभाराबद्दल शेतकऱ्यांनी घोषणाबाजी केली.
ढोकी, तेर, दारफळसह परिसरातील हजारो शेतकऱ्यांनी ढोकी येथील केंद्रावर हरभरा घातला आहे़ सध्या पावसाअभावी खरिपातील पिके हातची गेली आहेत़ दुसरीकडे घातलेल्या हरभऱ्याचे अनुदानही मिळत नाही़ यापूर्वी शेतकऱ्यांनी केंद्रापासून थेट मार्केट फेडरेशन कार्यालयात वेळोवेळी चकरा मारल्या़ मात्र, ‘उद्या- परवा’ हे उत्तर ऐकूण शेतकऱ्यांना परतावे लागले़ आस्मानी-सुलतानी संकटांमुळे आर्थिक विवंचनेत सापडेलेल्या शेतकऱ्यांनी मंगळवारी दुपारी अचानक उस्मानाबाद येथील जिल्हा मार्केट फेडरेशन कार्यालय गाठले़ हरभऱ्याच्या अनुदानाची मागणी केल्यानंतर ‘उद्या- परवा’ हेच उत्तर संबंधित अधिकाऱ्यांकडून मिळाले़
यावेळी संतापलेल्या शेतकऱ्यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना कार्यालयाबाहेर आणि कार्यालयाला टाळे ठोकले़ यावेळी प्रशासन विरोधी घोषणाबाजी करीत परिसर दणाणून सोडला होता़ यावेळी दारफळ येथील विजय पाटील, रणजित इंगळे, ढोकी येथील सुरेश समुद्रे, अशोक लोंढे, तेर येथील जुनेद मोमीन, हरिभाऊ कुलकर्णी, इद्रीस काझी, जवळा (दु़) येथील राजेंद्र जाधव यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते़
लवकरच अनुदान मिळेलयाबाबत जिल्हा मार्केटींग अधिकारी मनोज वाजपेयी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, शेतकऱ्यांच्या भावना वरिष्ठांपर्यंत पोहोचविल्या आहेत़ अनुदानाचे लवकरात लवकर वाटप व्हावे, यासाठी पाठपुरावा सुरू आहे़ ढोकी केंद्रावरील शेतकऱ्यांचेही लवकरच अनुदान वाटप केले जाईल़