शिराढोण : कळंब तालुक्यातील शिराढोण येथील फिडरवर गेल्या पंधरा दिवसांपासून ‘लो व्होल्टेज’ वीजपुरवठा होत आहे. तसेच वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाणही वाढल्याने विद्युत पंपात वारंवार बिघाड होत असून, विजेअभावी पिकांना पाणी मिळत नसल्याने पिके कोमेजली आहेत.
शिराढोण विद्युत उपकेंद्रातून रात्रपाळीमध्ये मध्यरात्री बारा ते पहाटेपर्यंत कमी दाबाने का होईना वीजपुरवठा होतो. परंतु दिवस निघाल्यापासून दर पंधरा मिनिटाला वीज खंडित होते. शिवाय, कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्यामुळे विद्युत पंपात बिघाड होत असल्याने याचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे. शिवाय, पिकांना पाणी पोहोचेपर्यंत वीज खंडित होत असल्याने पाणी असूनही विजेअभावी ते पिकांना मिळत नाही. सध्या कडक उन्हाळ्याचे दिवस असल्याने पिकांना पाण्याची नितांत गरज आहे. विहिरीचे पाणी कमी झाले असून, कूपनलिकेच्या विद्युत पंपातूनही सुरळीत पाणी उपलब्ध होत नसल्याने कडक उन्हामुळे पिके कोमेजू लागली आहेत. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन सुरळीत वीजपुरवठ्याबाबत कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.
प्रत्येक फिडर एक तास बंद
मुरुड येथील वीजपुरवठ्याचा भार वाढत असल्याने दिवस पाळीतील प्रत्येक फिडर एक तास बंद केला जातो. यामुळे शेतकऱ्यांना आठ तासांऐवजी सात तास वीजपुरवठा होतो. त्यात इतर कारणाने वीज खंडित होत असल्याने पाच तासच सुरळीत वीजपुरवठा होत असल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे.
वीजपुरवठा तांत्रिक अडचणीमुळे खंडित होतो. सुरळीत वीजपुरवठा करण्यासाठी
आमचा प्रयत्न असतो. शेतकऱ्यांनी रोहित्राच्या आर्थिंगला पाणी देणे गरजेचे आहे.
- प्रवीण धुमाळ, कनिष्ठ अभियंता
शिराढोण उपकेंद्रातील तांत्रिक उपकरण खराब झाल्यास किंवा लाइन फाॅल्ट काढण्याकडे दुर्लक्ष होत असल्याने
शेतकऱ्यांना सुरळीत वीजपुरवठा होत नाही. याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देण्याची गरज आहे.
- नामदेव माकोडे, संपर्कप्रमुख, रयत क्रांती
गेल्या पंधरा दिवसांपासून वीजपुरवठा सुरळीत मिळत नसल्याने विद्युत पंप, स्टार्टरचा बिघाड होत आहे. जलस्रोतातून पाणी उपलब्ध होत नसल्याने पिके वाळून जात आहेत.
- नामदेव पुदाले, शेतकरी, पिंपरी (शि.)