पतीचं दुसरं लग्न थांबवण्यासाठी रेल्वे ट्रॅकवर जाऊन बसली पत्नी आणि मग....
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2022 12:00 IST2022-02-11T11:59:45+5:302022-02-11T12:00:59+5:30
Kanpur : पोलीस स्टेशनमधून कारवाईला वेळ लागत असल्याने महिला आपल्या आईसोबत तिथेच रेल्वे ट्रॅकवर आत्महत्या करण्यासाठी बसली. जे बघून पोलिसांचे धाबे दणाणले.

पतीचं दुसरं लग्न थांबवण्यासाठी रेल्वे ट्रॅकवर जाऊन बसली पत्नी आणि मग....
कानपूरमध्ये (Kanpur) पतीचं दुसरं लग्न रोखण्यासाठी एका पत्नीने जे केलं ते वाचून तुम्ही हैराण व्हाल. पोलीस स्टेशनमधून कारवाईला वेळ लागत असल्याने महिला आपल्या आईसोबत तिथेच रेल्वे ट्रॅकवर आत्महत्या करण्यासाठी बसली. जे बघून पोलिसांचे धाबे दणाणले.
ही घटना कानपूरच्या कल्याणपूरमधील आहे. इथे पती अभिषेकचं दुसरं लग्न रोखण्यासाठी पत्नी साक्षी पोलीस स्टेशनसमोरील रेल्वे ट्रॅकवर बसली आणि म्हणाली की, जर तिच्या पतीला पोलिसांनी दुसरं लग्न करण्यापासून रोखलं नाही तर ती तिच्या आईसोबत रेल्वेखाली जीव देईल.
जे पोलिसवाले आधी तिचं काही ऐकून घेण्यास कानाडोळा करत होते. ते लगेच खळबळून जागे झाले आणि महिलेला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले. त्यांनी तक्रारीवर लगेच कारवाई करण्याचं आश्वासन दिलं. त्यानंतर पोलीस तिच्या पतीचं दुसरं लग्न रोखण्यासाठी घाईघाईने मंदिरात गेले. अशात नवरीला जसं समजलं की तिच्या होणाऱ्या नवऱ्याचं आधीही लग्न झालं आहे. तिने लगेच लग्नास नकार दिला.
साक्षीने सांगितलं की, ती मुरादाबादची राहणारी आहे आणि २०१६ मध्ये लखीमपूर खीरीच्या अभिषेकसोबत तिचं लग्न झालं होतं. महिलेचा आरोप आहे की, लग्नाच्या काही दिवसांनंतर हुंड्यात गाडी आणि पैशांच्या मागणीवरून पतीने मारहाण सुरू केली. काही दिवसांनी त्याने तिला घरातून काढलंही होतं.
साक्षीने सांगितलं की, तिला दोन दिवसांआधीच माहिती मिळाली होती की, पती अभिषेक ८ फेब्रुवारीला दुसरं लग्न करणार आहे. आणि हे लग्न कल्याणपूरच्या आशा मंदिरात होणार आहे.
याप्रकरणी एडीसीपी ब्रजेश श्रीवास्तव यांनी सांगितलं की, महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी दुसऱ्या तरूणीच्या परिवाराशी चर्चा केली. त्यांना आरोपी अभिषेकच्या पहिल्या लग्नाबाबत सूचना दिली. त्यानंतर तरूणीने लग्न करण्यास नकार दिला. आता साक्षीला या प्रकरणात कोणताही कारवाई नको आहे.