पतीला संपवण्यासाठी युट्यूब पाहून कानात टाकलं किटकनाशक; पत्नीने एक चूक केली अन् डाव तिच्यावरच उलटला
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 13:22 IST2025-08-07T13:13:48+5:302025-08-07T13:22:56+5:30
तेलंगणात एका महिलेने प्रियकरासह मिळून पतीला संपवल्याची घटना समोर आली.

पतीला संपवण्यासाठी युट्यूब पाहून कानात टाकलं किटकनाशक; पत्नीने एक चूक केली अन् डाव तिच्यावरच उलटला
Telagana Crime: देशभरात गेल्या काही महिन्यांपासून अनैतिक संबंधातून घडणाऱ्या गुन्ह्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पत्नीकडून पतींच्या हत्येच्या घटना दररोज समोर येत राहतात. काही बायका आपल्या पतींना शस्त्राने मारतात, तर काही विष देऊन. अशातच तेलंगणामध्ये पत्नीने पतीला अशा प्रकारे विष देऊन मारलं ज्याची सर्वत्र चर्चा सुरु आहे. युट्यूबर व्हिडीओ पाहून पत्नीने प्रियकरासह मिळून कट रचला आणि पतीला संपवलं. मात्र पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींना शोधून काढलं.
तेलंगणातील करीमनगरमध्ये एका पत्नीने युट्यूबवर तिच्या पतीला मारण्यासाठी काही गोष्टी पाहिल्या. त्यानंतर तिला मारण्याचा एक नवीन मार्ग सापडला. पत्नीने तिच्या प्रियकराद्वारे तिच्या पतीच्या कानात कीटकनाशक टाकले, ज्यामुळे पतीचा मृत्यू झाला. पण मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांना संशय आला, त्यानंतर त्यांनी कसून चौकशी केली तेव्हा संपूर्ण सत्य समोर आलं.
तेलंगणातील करीमनगरमधील रमादेवी नावाची एक विवाहित महिला तेलंगणातील प्रसिद्ध पदार्थ सर्वपिंडी विकत होती. या काळात राजैया नावाचा एक माणूस दररोज तिच्या गाडीवर सर्वपिंडी खाण्यासाठी यायचा. हळूहळू रमादेवी आणि राजैया यांच्यात जवळीक वाढली, पण रमादेवीचा पती संपत याला याची कल्पना आली. त्यामुळे रमादेवीने तिचा प्रियकर राजैयासह पती संपतला मारण्याचा कट रचला. पण याआधी झालेल्या प्रकरणांमध्ये सर्व आरोपी पकडले गेले होते हे रमादेवीच्या लक्षात आलं. त्यामुळे रमादेवीने हत्येचा एक नवीन मार्ग शोधला.
रमादेवीने युट्यूबवर पतीला संपवण्याचा मार्ग शोधायला सुरुवात केली. यादरम्यान तिला कळले की जर एखाद्या व्यक्तीच्या कानात गवताचे कीटकनाशक घातले तर तो मरतो. यानंतर रमादेवीने तिच्या प्रियकराला ही पद्धत वापरून पाहण्यास सांगितले. त्यानंतर प्रियकर राजैय्याने संपतला एका पार्टीला बोलावले. संपत दारू पिऊन झाल्यावर राजैयाने त्याच्या कानात कीटकनाशक घातले. त्यानंतर संपतचा जागीच मृत्यू झाला. राजैयाने रमादेवीला फोनवरून काम झाल्याचे सांगितले.
यासोबत रमादेवीने आणख एक योजना आखली होती. तिने तिच्या पतीच्या बेपत्ता होण्याबद्दल पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पण रमादेवीचा डाव तिच्यावरच उलटला. रमादेवीने तिच्या पतीचा मृतदेह सापडल्याचे पोलिसांना सांगण्याची चूक केली. यानंतर, पोलिसांना रमादेवीवर संशय आला आणि तिला ताब्यात घेण्यात आले. कसून चौकशीदरम्यान रमादेवी आणि राजैयाने त्यांचा गुन्हा कबूल केला.