त्या एका रात्रीत काय घडलं? शेजारीच राहायचे, प्रेम करायचे; पण शेवट मात्र मनाला चटका लावून जाणार..
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2026 13:37 IST2026-01-18T13:27:40+5:302026-01-18T13:37:50+5:30
१८ वर्षीय मुस्कान हिचा शुक्रवारीच मोठ्या थाटामाटात साखरपुडा पार पडला होता. ९ एप्रिलला तिचे लग्न ठरले होते. घरात पाहुण्यांची वर्दळ होती, पण..

AI Generated Image
उत्तर प्रदेशातील झाशी जिल्ह्यातून एक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. जिथे कालपर्यंत लग्नाची सनई-चौघडे वाजण्याची तयारी सुरू होती, तिथे आज मरणकळा पसरली आहे. पट्टी कुम्हरा गावात एका प्रेमीयुगुलाने कडुलिंबाच्या झाडाला एकाच दोरीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. धक्कादायक बाब म्हणजे, मृत तरुणीचा अवघ्या २४ तासांपूर्वीच साखरपुडा झाला होता.
साखरपुड्याच्या दुसऱ्याच दिवशी अघटित
मिळालेल्या माहितीनुसार, १८ वर्षीय मुस्कान हिचा शुक्रवारीच मोठ्या थाटामाटात साखरपुडा पार पडला होता. ९ एप्रिलला तिचे लग्न ठरले होते. घरात पाहुण्यांची वर्दळ होती, आनंदाचे वातावरण होते. मात्र, शनिवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास जेव्हा गावकरी बाहेरील बाजूला आले, तेव्हा त्यांना एका जुन्या कडुलिंबाच्या झाडाला दोन मृतदेह लटकलेले दिसले. हे पाहून संपूर्ण गावात खळबळ उडाली.
मृतदेहांच्या स्थितीमुळे गूढ वाढलं
घटनास्थळी जेव्हा पोलीस पोहोचले तेव्हा त्यांना काही गोष्टींनी चक्रावून सोडले. मृत मुस्कानच्या भांगेत कुंकू आणि तिच्या पायात जोडवी होती. सहसा विवाहित स्त्रिया या गोष्टी परिधान करतात. त्यामुळे आत्महत्येपूर्वी या दोघांनी गुपचूप लग्न केले होते का? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. मुस्कानसोबत गळफास घेतलेल्या तरुणाची ओळख रियाजुल म्हणून झाली आहे. तो लोडर चालक म्हणून काम करायचा.
शेजारी राहूनही पालकांना नव्हता सुगावा
मुस्कान आणि रियाजुल यांची घरे एकमेकांच्या अगदी जवळ आहेत. त्यांच्यात प्रेमसंबंध असल्याची चर्चा आता गावात उघडपणे सुरू आहे. मात्र, मुस्कानच्या वडिलांनी तिला अशा कोणत्याही प्रेमसंबंधांची कल्पना नसल्याचे सांगितले. साखरपुडा झाल्यावर ती सामान्य वागत होती, असेही त्यांनी नमूद केले. रियाजुलच्या कुटुंबानेही या प्रकरणावर आश्चर्य व्यक्त केले आहे.
पोलीस तपासात काय समोर येणार?
एकाच दोरीने गळफास घेतलेल्या या प्रेमीयुगुलाने सामाजिक दबावातून हे पाऊल उचलले की यामागे आणखी काही कारण आहे, याचा तपास पोलीस करत आहेत. "आम्ही दोन्ही मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत. अहवाल आल्यानंतर आणि तांत्रिक तपास पूर्ण झाल्यावरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल," अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून 'त्या' एका रात्रीत असं काय घडलं की दोघांनी मृत्यूला कवटाळलं, हे कोडं अद्याप सुटलेलं नाही.