कार दुभाजकावर धडकून पाच वेळा पलटी झाल्याने दोन तरुणाचा गेला जीव
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2021 16:16 IST2021-07-08T16:16:29+5:302021-07-08T16:16:47+5:30
Accident : जळगाव नजीक महामार्गावर पहाटे अपघात; दोन तरुण ठार

कार दुभाजकावर धडकून पाच वेळा पलटी झाल्याने दोन तरुणाचा गेला जीव
जळगाव : महामार्गावर नशिराबाद गावानजीक गुरुवारी पहाटे तीन वाजता भरधाव कार पलटी होऊन अभीजित सुभाष पसारे (वय ३०, रा.डोंबिवली, मुळ रा.इंद्रप्रस्थ नगर, जळगाव) व पवन नंदू बागुल (वय २८,रा.मानपाडा) हे दोघं तरुण ठार झाले. चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने कार दुभाजकावर धडकून पाच वेळा पलटी झाल्याने दोघांचा त्यात जीव गेला.
अभीजीत पसारे याचे साकेगाव, ता.भुसावळ येथील तरुणीशी लग्न ठरले होते. साखरपुडाही झालेला आहे. या तरुणीच्या वडिलांना कर्करोगाचा आजार असल्याने त्यांच्यावर मुंबईत उपचार सुरु आहेत. होणारी पत्नी व सासु या दोघांना सोडण्यासाठी कारने आला होता. पवन बागुल याचे सहा महिन्यापूर्वीच लग्न झालेले आहे. त्याची सासरवाडी मालेगाव येथील आहे. पत्नी दोन दिवसापूर्वीच मालेगावला आलेली आहे. परत जाताना मालेगाव येथून पवनच्या पत्नीला घेऊन जाण्याचे त्यांनी नियोजन केले होते. त्यानुसार बुधवारी रात्री दोघं जण कारने मालेगावच्या दिशेने निघाले असता नशिराबाद सोडल्यानंतर सरस्वती फोर्ड या शोरुमसमोर हा अपघात झाला. अभिजीत हा जागीच ठार झाला तर पवन याचा सकाळी उपचार सुरु असताना मृत्यू झाला.