धक्कादायक! 3 सख्ख्या भावांचे अपहरण आणि खून; जंगलात फेकून दिले मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2022 13:40 IST2022-10-18T13:39:21+5:302022-10-18T13:40:24+5:30
7 आणि 5 वर्षीय मुलांचे मृतदेह पोलिसांना सापडले असून, तिसऱ्याचा शोध सुरू आहे.

धक्कादायक! 3 सख्ख्या भावांचे अपहरण आणि खून; जंगलात फेकून दिले मृतदेह
Rajasthan Crime News:दिल्लीमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. राजस्थानमधील भिवडी येथून अपहरण करण्यात आलेल्या तीन मुलांपैकी दोन मुलांचे मृतदेह आज दक्षिण दिल्लीतील मेहरौली जंगलात सापडले आहेत. राजस्थान आणि दिल्ली पोलिसांच्या संयुक्त शोध मोहिमेत मुलांचे मृतदेह सापडले. दोघांचे वय 7 वर्षे आणि 5 वर्षे असल्याचे सांगण्यात येत असून, आता तिसऱ्या मुलाचा शोध सुरू आहे. अपहरणकर्त्यांनी तिघांच्याही खुनाची कबुली दिली आहे.
तीन सख्ख्या भावांचे अपहरण
तिन्ही मुलांची जंगलात हत्या केल्याचे अपहरणकर्त्यांने सांगितले. राजस्थान पोलीस आज दोन अपहरणकर्त्यांना घेऊन दिल्लीच्या मेहरौलीच्या जंगलात पोहोचले. अपहरणकर्त्यांच्या सांगण्यावरून दोन मुलांचे मृतदेह सापडले आहेत, तर तिसऱ्या मुलाचा शोध सुरू आहे. भिवडीतील लेबर कॉलनीतून या तिघांचे अपहरण करण्यात आले होते. विशेष म्हणजे, हे तिघे सख्खे भाऊ आहेत.
घरातून तिघे अचानक गायब झाले होते
तीन महिन्यांपूर्वी भिवडीच्या लेबर कॉलनीत ज्ञानसिंग राहायला आले. उत्तर प्रदेशातील रहिवासी असलेले ज्ञान सिंह पत्नी उर्मिला आणि 6 मुलांसह येथे भाड्याने खोली घेऊन राहत होते. शनिवारी रात्री 11 वाजता पती-पत्नी घरी परतले असता त्यांना तीन मुले अमन, विपिन आणि शिव घरात नसल्याचे दिसले, तर त्यांची लहान मुलगी घरातच खेळत होती.
पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे दोन अपहरणकर्त्यांना अटक केली. अपहरणकर्त्यांनी सांगितले की, तीन मुलांची हत्या केल्यानंतर त्यांनी मृतदेह दिल्लीच्या मेहरौली जंगलात फेकून दिला. सध्या अपहरणकर्त्यांच्या सांगण्यावरून दोन मुलांचे मृतदेह हाती लागले आहेत, तर तिसऱ्या मुलाचा शोध सुरू आहे. मुलांचे अपहरण का करण्यात आले, याची माहिती अद्याप मिळू शकली नाही.