नोएडा हादरलं! पत्नीशी वाद, सालीवर वार अन् १६ व्या मजल्यावरून उडी; सॉफ्टवेअर इंजिनिअरचा थरारक अंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 09:26 IST2026-01-28T09:21:35+5:302026-01-28T09:26:42+5:30
उत्तर प्रदेशात मेहुणीवर हल्ला करुन एका व्यक्तीने स्वतःला संपवल्याची घटना घडली आहे.

नोएडा हादरलं! पत्नीशी वाद, सालीवर वार अन् १६ व्या मजल्यावरून उडी; सॉफ्टवेअर इंजिनिअरचा थरारक अंत
Noida Crime:उत्तर प्रदेशच्या ग्रेटर नोएडा वेस्ट येथील एका सोसायटीमध्ये मंगळवारी संध्याकाळी धक्कादायक प्रकार घडला. घरगुती वादातून एका सॉफ्टवेअर इंजिनिअरने आपल्या मेहुणीवर चाकूने हल्ला केला आणि त्यानंतर पोलीस येण्याच्या भीतीने १६ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यामध्ये पोलीस मृत व्यक्तीला बाईकवरुन घेऊन जाताना दिसत आहे.
बिसरख पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पॅरामाउंट इमोशन्स सोसायटीमध्ये ही धक्कादायक घटना घडली. ३८ वर्षीय शत्रुघ्न सिन्हा हा आपल्या पत्नी आणि ८ वर्षांच्या मुलासह येथे राहत होता. मंगळवारी रात्री त्याचे पत्नीशी कडाक्याचे भांडण झाले. वादाच्या भरात त्याने पत्नीला मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या मेहुणीवर त्याने भाजी कापण्याच्या चाकूने हल्ला केला, ज्यामध्ये ती जखमी झाली.
पोलीस येण्यापूर्वीच टोकाचे पाऊल
घटनेनंतर घाबरलेल्या पत्नीने तात्काळ पोलिसांना फोन करून माहिती दिली. आपण पोलिसांच्या ताब्यात जाऊ आणि समाजात बदनामी होईल, या भीतीने शत्रुघ्नने स्वतःला फ्लॅटमध्ये कोंडून घेतले. पोलीस घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच त्याने १६ व्या मजल्यावरील बाल्कनीतून खाली उडी मारली. त्याला गंभीर अवस्थेत यथार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
बेरोजगारी आणि मानसिक तणाव
मिळालेल्या माहितीनुसार, शत्रुघ्न सिन्हा स्वतः एक सॉफ्टवेअर इंजिनिअर होता, मात्र गेल्या सहा महिन्यांपासून तो बेरोजगार होता. त्याची पत्नीदेखील एका आयटी कंपनीत इंजिनिअर आहे. नोकरी नसल्यामुळे तो प्रचंड मानसिक तणावाखाली होता. प्राथमिक तपासात, घटनेच्या वेळी तो दारूच्या नशेत होता आणि घरात सतत होणारे वाद हे आत्महत्येचे मुख्य कारण ठरले असे समोर आलं आहे.
पोलीस तपासात काय समोर आले?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृताकडे कोणतीही सुसाइड नोट सापडलेली नाही. बेरोजगारी, कौटुंबिक कलह आणि मद्यपान या तीन गोष्टींमुळे हा अनर्थ घडल्याचे प्राथमिक चौकशीत दिसतेय. जखमी मेहुणीची प्रकृती आता धोक्याबाहेर आहे. तर शत्रुघ्न सिन्हाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.