उत्तर प्रदेशातील रामपूर जिल्ह्यातील टांडा पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या सैदनगरमध्ये १३ मार्चच्या रात्री एका तरुणाचा मृतदेह आणि जवळच त्याची बाईक सापडली होती. सुरुवातीला ही घटना एक अपघात असल्यासारखी वाटत होती, मात्र मृतदेहाच्या गळ्यावर आणि चेहऱ्यावर असलेल्या खुणांनी संशय निर्माण केला. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये मृत्यूचं कारण गळा आवळल्यामुळे झाल्याचं समोर आल्यानंतर पोलिसांनी सखोल तपास सुरू केला.
पोलिसांनी या प्रकरणाचा खुलासा करताना सांगितलं की, ही हत्या दुसऱ्या कोणीही केली नसून मृत व्यक्तीचा भाचा वीरेंद्र याने आपला साथीदार जितेंद्र उर्फ छोटू याच्या मदतीने केली होती. आरोपी वीरेंद्रचं आपल्या मामीवर एकतर्फी प्रेम होतं आणि मामाला आपल्या रस्त्यातून हटवण्यासाठी त्याने हे भयानक पाऊल उचललं. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.
अपर पोलीस अधीक्षक (रामपूर) अनुराग सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी हत्येचा संपूर्ण कट फिल्मी स्टाईलने रचला होता. आरोपी भाचा वीरेंद्र आपल्या मामाला शेतात घेऊन गेला, तिथे त्याने मामाला भरपूर दारू पाजली. जेव्हा मामा नशेमुळे पूर्णपणे बेशुद्ध झाला, तेव्हा वीरेंद्रने आपल्या मित्राच्या मदतीने मफलरने गळा आवळून त्यांची हत्या केली. हा गुन्हा केल्यानंतर दोघांनी पुरावे नष्ट करण्यासाठी आणि पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी कट रचला.
पोलिसांना चकवा देण्यासाठी आरोपींनी मृतदेह बाईकवर ठेवला आणि बाईक सुरू केली. त्यानंतर एक्सलरेटर देऊन बाईक रस्त्याच्या कडेला पाडली, जेणेकरून पाहणाऱ्याला हा अपघात वाटेल. मात्र पोलिसांची चपळाई आणि पोस्टमार्टम रिपोर्टमधील वैज्ञानिक पुराव्यांसमोर आरोपींचा हा डाव फसला. एएसपींनी सांगितलं की, सध्या एकतर्फी प्रेमप्रकरणातून तपास सुरू असून दोन्ही आरोपींना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं आहे.