तुफान राडा! 'जिलेबी'साठी लाठ्या-काठ्या घेऊन गावकरी भिडले, ४ गाड्यांच्या काचा फोडल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2026 15:20 IST2026-01-27T15:19:29+5:302026-01-27T15:20:15+5:30
प्रजासत्ताक दिन सोहळ्यानंतर 'जिलेबी'वरून मोठा वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, थेट लाठ्या-काठ्या चालल्या आणि ४ गाड्यांच्या काचा फोडण्यात आल्या.

तुफान राडा! 'जिलेबी'साठी लाठ्या-काठ्या घेऊन गावकरी भिडले, ४ गाड्यांच्या काचा फोडल्या
बिहारच्या जहानाबादमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रजासत्ताक दिन सोहळ्यानंतर 'जिलेबी'वरून मोठा वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, थेट लाठ्या-काठ्या चालल्या आणि ४ गाड्यांच्या काचा फोडण्यात आल्या. इतकंच नाही तर ज्या पंचायत भवनात हा कार्यक्रम सुरू होता, तिथल्या सरपंचाला पळून जाऊन आपला जीव वाचवावा लागला. काही लोकांनी जिलेबी चोरून नेण्याचा प्रयत्न केल्यावर हा सर्व वाद सुरू झाला.
पसरबिगहा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोनवा पंचायत भवनात ही घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमरनाथ सिंह यांनी पंचायत भवनात ध्वजारोहण केलं होतं. प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी सरपंचांच्या वतीने एक क्विंटल जिलेबीची व्यवस्था करण्यात आली होती. याच दरम्यान पंचायतीमधील काही खोडकर तरुण जिलेबी घेऊन पळू लागले आणि तिथूनच गोंधळाला सुरुवात झाली.
सोहळ्यानंतर गावकऱ्यांना वाटण्यासाठी ही १ क्विंटल जिलेबी मागवण्यात आली होती. झेंडावंदन झाल्यानंतर लगेचच काही लोक जिलेबी घेऊन पळू लागले. जेव्हा लोकांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला, तेव्हा वातावरण अचानक तापलं. त्यानंतर गावकरी लाठ्या-काठ्या आणि विटा-दगड घेऊन एकमेकांसमोर आले. परिस्थिती इतकी बिघडली की, सरपंच अमरनाथ सिंह यांना कसाबसा तिथून पळ काढून आपला जीव वाचवावा लागला.
या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये गावकरी एकमेकांशी कसे भिडत आहेत हे स्पष्ट दिसत आहे. या हिंसक हाणामारीत पंचायत भवन परिसरात उभ्या असलेल्या चार गाड्यांच्या काचा फोडण्यात आल्या. जिलेबीवरून झालेल्या वादातून आपल्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला, असा आरोप अमरनाथ सिंह यांनी केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. पोलीस घटनास्थळी पोहोचून प्रकरणाचा तपास करत आहेत.