प्रेम की अपहरण? अल्पवयीन प्रियकराला घेऊन पळणाऱ्या तरुणीला पोलिसांनी कसं पकडलं? एका चुकीने दोघे ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 15:10 IST2026-03-11T15:09:15+5:302026-03-11T15:10:32+5:30
सुरत रेल्वे स्थानकावर फिल्मी स्टाईलने पकडलं प्रेमी जोडपं.

प्रेम की अपहरण? अल्पवयीन प्रियकराला घेऊन पळणाऱ्या तरुणीला पोलिसांनी कसं पकडलं? एका चुकीने दोघे ताब्यात
MP Crime: प्रेम आंधळं असतं असं म्हटलं जातं, पण प्रेमाच्या नादात कायद्याची चौकट मोडणं किती महागात पडू शकतं, याचा प्रत्यय सुरत रेल्वे स्थानकावर आला आहे. इन्स्टाग्रामवर झालेल्या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले आणि चक्क २१ वर्षांची तरुणी आपल्या १७ वर्षांच्या अल्पवयीन प्रियकराला घेऊन पळून आली. मात्र, सुरत रेल्वे पोलिसांच्या विशेष टीमच्या सतर्कतेमुळे हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे.
इन्स्टाग्रामवर मैत्री आणि प्रेमाशी शपथ
मध्य प्रदेशातील २१ वर्षीय मोना (नाव बदललेले आहे) आणि गुजरातच्या राजकोटमधील वीरपूरचा १७ वर्षीय राज (नाव बदललेले आहे) यांची दीड वर्षापूर्वी इन्स्टाग्रामवर मैत्री झाली होती. रोजच्या गप्पांतून या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. दोघांनी एकमेकांसोबत जगण्या-मरण्याच्या आणाभाका घेतल्या होत्या. दरम्यान, तरुणीच्या घरच्यांनी तिचे लग्न दुसरीकडे ठरवल्याने तिने घर सोडून प्रियकरासोबत पळून जाण्याचा धाडसी निर्णय घेतला.
६ मार्चचा तो प्लॅन आणि पोलिसांचा संशय
मिळालेल्या माहितीनुसार, ६ मार्च २०२६ रोजी तरुणी मध्य प्रदेशातील घरातून कुणालाही न सांगता बाहेर पडली. आधी ती मुंबईला गेली आणि तिथून आपल्या अल्पवयीन प्रियकराला घेऊन सुरतला पोहोचली. दुसरीकडे, मुलगा घरातून बेपत्ता झाल्याने राजकोटमधील वीरपूर पोलीस ठाण्यात त्याच्या अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
विशेष टीमची नजर आणि सत्य उघड
सुरत रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म नंबर १ वर गस्त घालत असताना पोलिसांच्या टीमला वेटिंग रूममध्ये एक जोडपे संशयास्पद अवस्थेत बसलेले दिसले. त्यांच्या चेहऱ्यावरील भीती आणि गोंधळ पाहून महिला पोलिसांनी त्यांची चौकशी सुरू केली. सुरुवातीला दोघांनी उडवाउडवीची उत्तरे दिली, पण पोलिसी खाक्या दाखवताच संपूर्ण सत्य बाहेर आले.
प्रेम की अपहरण?
मुलगी २१ वर्षांची आहे, तर मुलगा १७ वर्षांचा म्हणजेच कायद्याने अल्पवयीन आहे. कायद्यानुसार, अल्पवयीन मुलाला त्याच्या पालकांच्या संमतीशिवाय सोबत नेणे हा अपहरणाचा गुन्हा ठरतो. राजकोट पोलिसांनी यापूर्वीच अपहरणाची तक्रार नोंदवली होती. राजकोट पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. सुरत रेल्वे पोलिसांनी राजकोट पोलिसांशी संपर्क साधून ९ मार्चच्या रात्री दोघांना त्यांच्या स्वाधीन केले. सुरत पोलिसांच्या सतर्कतेमुळे मुलगा पुन्हा पालकांकडे पोहोचला.