मध्य प्रदेशातील इंदूर येथील राजा रघुवंशी हत्याकांडाने संपूर्ण देशाला हादरवून सोडले आहे. लग्नाच्या काही दिवसांतच पत्नी सोनमने पती राजा रघुवंशीची हत्या केली. आता उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये अशीच एक विचित्र घटना समोर आली आहे, ज्यामुळे पुन्हा एकदा लोकांना राजा रघुवंशी हत्याकांडाची आठवण झाली आहे. एका नववधूने मधुचंद्राच्या रात्रीच वरासोबत असे काही केले की, त्याला धक्काच बसला.
नववधूने नवऱ्याला चाकूचा धाक दाखवत धमकी दिली की, जर त्याने तिला स्पर्श केला, तर ती त्याचे ३५ तुकडे करेल. इतकेच नव्हे तर, ती आपल्या प्रियकरासोबत जाण्याचा हट्ट धरू लागली. या धक्कादायक प्रकारानंतर दुसऱ्याच रात्री वधू वराच्या घराच्या भिंतीवरून उडी मारून पळून गेली.
प्रयागराजच्या नैनी भागात राहणाऱ्या कॅप्टन निषाद यांचे लग्न २९ एप्रिल रोजी करचना देह येथील रहिवासी लक्ष्मी नारायण निषाद यांची मुलगी सितारा हिच्याशी झाले होते. लग्नापर्यंत सर्व काही व्यवस्थित होते, पण लग्नाच्या रात्री जे घडले, ते वरासाठी अनपेक्षित होते.
जर तू मला स्पर्श केलास, तर तुझे ३५ तुकडे होतील!कॅप्टन निषादने तक्रार करताना सांगितले की, सुहागरात्रीच्या रात्री सिताराने त्याला चाकू दाखवून धमकी दिली की, "जर तू मला स्पर्श केलास तर तुझे ३५ तुकडे करेन. मी दुसऱ्याची आहे," असे ती म्हणाली. यानंतर सितारा पलंगावर झोपली आणि निषाद सोफ्यावर झोपला. सलग तीन रात्री सितारा कॅप्टनला चाकू दाखवून धमकावत राहिली. अखेर त्याचा संयम सुटला आणि त्याने याबद्दल आपल्या आईला सांगितले, त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले.
अखेर वधू प्रियकरासोबत पळाली!कॅप्टन निषादचे वडील राम असारे यांनी सांगितले की, "आम्ही प्रेमाने आमच्या सुनेला तिच्या खोलीतून बोलावले आणि काय झाले ते विचारले. तेव्हा तिने स्पष्टपणे सांगितले की, मी अमनवर प्रेम करते आणि मला त्याच्यासोबतच राहायचे आहे. फक्त तोच मला हात लावू शकतो, दुसरे कोणीही नाही'." यानंतर सिताराचे वडीलही आले, पण काही तोडगा निघाला नाही. अखेर पंचायत भरवण्यात आली. पंचायतीत सितारा कुठेही जाणार नाही आणि सून म्हणून इथेच राहील, तसेच तिने प्रियकराला विसरावे, असे ठरले. परंतु, तरीही सितारा बंद खोलीत पतीला त्रास देत राहिली. अखेर राम असारे यांना हे प्रकरण पोलीस ठाण्यात घेऊन जावे लागले. परंतु, त्याच दरम्यान मध्यरात्री सितारा आपल्या प्रियकरासह पळून गेली.