हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 13:19 IST2025-06-12T13:18:52+5:302025-06-12T13:19:09+5:30
केरळमधील एक सुंदर पर्यटन स्थळ असलेल्या मुनार येथे १९ वर्षांपूर्वी सेम टू सेम अशीच धक्कादायक घटना घडली.

हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
इंदूरच्या राजा रघुवंशी हत्या प्रकरणात पत्नी सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडला अटक करण्यात आली आहे. यापूर्वी मेरठच्या मुस्कानने तिचा पती सौरभची बॉयफ्रेंड साहिलच्या मदतीने हत्या केली. नंतर मृतदेहाचे तुकडे करून ते निळ्या ड्रममध्ये ठेवले. अशीच एक अंगावर काटा आणणारी घटना आता समोर आली आहे. केरळमधील एक सुंदर पर्यटन स्थळ असलेल्या मुनार येथे १९ वर्षांपूर्वी सेम टू सेम अशीच धक्कादायक घटना घडली.
पम्मल परिसरातील अनंतरामन लग्नाच्या नऊ दिवसांनी पत्नी विद्यालक्ष्मीसोबत हनिमूनला गेला होता. दोघेही चेन्नईहून त्रिशूरला ट्रेनने गेले. त्यानंतर गुरुवायूर मंदिरात दर्शन घेतलं. त्यानंतर दोघेही मुनारला टॅक्सीने गेले आणि एका आलिशान रिसॉर्टमध्ये राहिले. दुसऱ्या दिवशी ते प्रसिद्ध पर्यटन स्थळ कुंडला धरणावर पोहोचले, जिथे विद्यालक्ष्मी तिचा पती अनंतला एका निर्जन भागात घेऊन गेली. त्यानंतर अचानक ती रस्त्यावर ओरडत आली आणि टॅक्सी चालकाला सांगितलं की दोन लोकांनी तिच्या पतीची हत्या केली आहे आणि दागिने आणि रोख रक्कम घेऊन पळून गेले आहेत. चालकाने ताबडतोब पोलिसांना फोन केला.
ऑटो चालकाने पोलिसांना दिली माहिती
आनंद आणि अंबुराज हे दोन तरुण कुंडला धरणा येऊन ऑटोने हॉटेल अराफासाठी निघाले. ते खूप घाबरलेले दिसत होते. त्यांनी ऑटो चालकाला सांगितलं की त्यांना लवकरात लवकर मुनारमधून बाहेर पडायचं आहे. पण हॉटेलमध्ये पोहोचताच ऑटो चालकाने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी दोन्ही तरुणांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणलं, जिथे विद्यालक्ष्मी आधीच उपस्थित होती, जी तिच्या पतीच्या हत्येची तक्रार नोंदवण्यासाठी आली होती. तिला कल्पना नव्हती की ज्या लोकांनी तिच्या पतीची हत्या केली आहे ते तिच्यासमोर येतील.
आनंद आणि विद्यालक्ष्मी होते प्रेमात
काही वेळातच हनिमून आणि हत्या प्रकरणाचा संपूर्ण प्लॅन समोर आला. विद्यालक्ष्मीने तिचा प्रियकर आनंद द्वारे तिच्या पतीची हत्या केली होती. तपासात असं समोर आलं की, आनंद आणि विद्यालक्ष्मी प्रेमात होते आणि ते चेन्नईमध्ये लहानपणापासूनच एकमेकांना ओळखत होते. पण आनंद गरीब होता आणि त्याची जात देखील विद्यालक्ष्मीपेक्षा वेगळी होती. म्हणूनच तिने अनंतरामनशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. जेणेकरून नंतर त्याला आपल्या मार्गातून बाजुला काढता येईल.
पतीच्या मोबाईलद्वारे प्रियकर आनंदशी संपर्कात
विद्यालक्ष्मी खूप हुशार होती आणि हनिमून दरम्यान तिच्या पतीच्या मोबाईलद्वारे तिचा प्रियकर आनंदशी संपर्कात होती. आनंद आणि अंबुराज एकाच ट्रेनमध्ये चढून मुनार येथे पोहोचले होते, जिथे विवाहित कपल देखील उपस्थित होते. ते दोघेही गुरुवायूर मंदिरापर्यंत त्यांचा पाठलाग करत होते. पण त्यांना रिसॉर्टमध्ये खोली न मिळाल्याने ते जवळच्या अराफा हॉटेलमध्ये राहिले. त्यानंतर कुंडला धरणाजवळ संधी मिळताच दोघांनीही अनंतरामनचा गळा दाबून खून केला. २००६ मध्ये घडलेल्या या भयंकर प्रकरणात न्यायालयाने दोघांनाही जन्मठेपेची शिक्षा सुनावली.