पतीने पकडले पाय, दिराने हात अन् जीव जाईपर्यंत गळा दाबत राहिला बाप! ऐकून होईल काळजाचं पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 10:58 IST2025-06-02T10:56:26+5:302025-06-02T10:58:30+5:30

खैरागड या गावात राहणाऱ्या एका महिलेला तिच्याच कुटुंबाने अतिशय क्रूरपणे संपवले आहे. पतीने या महिलेचे पाय पकडले, तर दिराने हात पकडून ठेवले आणि पित्यानेच तिचा गळा दाबायला सुरुवात केली.

Crime News: Husband held her feet, brother-in-law held her hands and father kept strangling her until she died! Hearing this murder story will make your heart ache | पतीने पकडले पाय, दिराने हात अन् जीव जाईपर्यंत गळा दाबत राहिला बाप! ऐकून होईल काळजाचं पाणी

पतीने पकडले पाय, दिराने हात अन् जीव जाईपर्यंत गळा दाबत राहिला बाप! ऐकून होईल काळजाचं पाणी

उत्तर प्रदेशातून एक अतिशय धक्कादायक हत्या प्रकरण समोर आले आहे. आग्र्यातील खैरागड या गावात राहणाऱ्या एका महिलेला तिच्याच कुटुंबाने अतिशय क्रूरपणे संपवले आहे. पतीने या महिलेचे पाय पकडले, तर दिराने हात पकडून ठेवले आणि पित्यानेच तिचा गळा दाबायला सुरुवात केली. या दरम्यान महिला जिवाच्या आकांताने ओरडून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत होती. मात्र, एकालाही तिची दया आली नाही. अनैतिक संबंधातून हा खून झाल्याचे समोर आले आहे. 

शनिवारी ३१ मे रोजी खैरागडच्या भोपूर गावात एका महिलेचा मृतदेह आढळला. या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले होते. ते फोटो पाहून मृत महिलेचे वडील कोमल सिंह यांनी पोलिसांना फोनवरून संपर्क केला. या महिलेचे नाव सुनीता असून ती आपल्या कुटुंबासह आग्र्यात राहत होती.

पोलिसांना आला संशय

वडिलांनी ओळख पटवल्यावर सुनीताचा मृतदेह तिच्या घरी नेण्यात आला. तिचा देह पाहून वडिलांनी रडण्याचं नाटक तर केलं. मात्र, पोलिसांना संशय आल्याने त्यांनी कुटुंबाची चौकशी करण्यास सुरुवात केली. मात्र, या चौकशीत सुनीता आणि तिच्या पतीमध्ये वाद सुरू असल्याचे समोर आले. यामुळेच सुनीता काही दिवस तिच्या माहेरी राहण्यासाठी आली होती. या चौकशीनंतरही पोलिसांना सुनीताच्या वडिलांवर संशय कायम होता.   

बहिणीने सांगितलं सत्य

सुनीताची बहीण पूजा हिने पोलिसांना फोन करून सत्य परिस्थिती सांगण्याचा प्रयत्न केला. पूजाने पोलिसांना सांगितले की, सुनीताचा पती तिला सतत मारहाण करायचा. दोघांचे संबंध चांगले नव्हते. या दरम्यान सुनीता तिचा चुलत दीर विष्णु याच्या प्रेमात पडली होती. दोघांना एकमेकांशी लग्न करायचे होते. आपण स्वतः सुनीताला माहेर घेऊन आलो होतो, असे देखील पूजाने सांगितले.

या प्रकरणात विष्णूचे नाव समोर येताच, पोलिसांनी विष्णूबद्दल माहिती गोळा केली आणि सुनीताबद्दल माहिती मिळविण्यासाठी त्याच्याशी संपर्क साधला. विष्णूने पोलिसांना सांगितले की, सुनीताने २९ मे, शुक्रवारी रात्री त्याला फोन करून सांगितले होते की, तिचे वडील आणि पती तिला मारून टाकतील. सुनीताने फक्त एवढेच बोलून फोन ठेवला होता. यानंतर विष्णू सुनीताच्या वडिलांना अनेक वेळा फोन केला, पण त्यांनी एकदाही त्याचा फोन उचलला नाही. यानंतर त्याने सुनीताची बहीण पूजाला याबद्दल माहिती दिली.

तिन्ही आरोपींना अटक 
जेव्हा विष्णूने पूजाला सुनीताबद्दल सांगितले, तेव्हा पूजा तिच्या आईच्या घरी पोहोचली. पूजा म्हणाली की, आई त्यावेळी खूप घाबरली होती आणि तिने मला घाबरून सांगितले की, सुनीता आता कधीच परत येणार नाही. कारण तिच्या वडिलांनी तिचा नवरा आणि दीर जल सिंह यांच्यासोबत मिळून तिची हत्या केली आहे. पूजाने सांगितले की, त्यांनी तिच्या आईलाही धमकी दिली होती. यानंतर संपूर्ण प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक करून त्यांची चौकशी केली.

मृतदेह आणून खैरागडमध्ये टाकला
पोलिसांनी ताब्यात घेताच वडील, पती आणि दिराने महिलेची हत्या केल्याची कबुली दिली. सुनीताच्या वडिलांना वाटले की, त्यांच्या मुलीच्या अनैतिक  संबंधांमुळे त्यांची बदनामी होत आहे. अशा परिस्थितीत, आपली अब्रू वाचवण्यासाठी मुलीला मारण्याचा कट रचला. यात त्यांनी मुलीचा पती आणि दीर यांचीही साथ मागितली. तिघांनी मिळून धोलपूरमध्येच तिची हत्या केली. यानंतर सुनीताचा मृतदेह दुचाकीवरून खैरागड येथे घेऊन गेले आणि तिथे फेकून दिला.

Web Title: Crime News: Husband held her feet, brother-in-law held her hands and father kept strangling her until she died! Hearing this murder story will make your heart ache

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.