"माझी नाही तर कोणाचीच नाही"; लग्नात नवरीवर झाडली गोळी; माथेफिरू तरुणाचं भयंकर कृत्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 12:01 IST2026-02-25T11:59:56+5:302026-02-25T12:01:05+5:30
एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या एका माथेफिरू तरुणाने धक्कादायक कृत्य केलं आहे.

फोटो - tv9hindi
बिहारमधील बक्सर जिल्ह्यात एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या एका माथेफिरू तरुणाने धक्कादायक कृत्य केलं आहे. चौसा नगर पंचायतीच्या एका लग्नात जेव्हा हार घालण्याचा विधी सुरू होता आणि संपूर्ण कुटुंब आनंदात होतं, त्याच वेळी एका माथेफिरू तरुणाने स्टेजवर चढून नवरीवर सर्वांसमोर गोळी झाडली. गोळी लागताच नवरी रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळली आणि लग्नमंडपात एकच खळबळ माजली.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यातून वरात बक्सरला पोहोचली होती. नवरदेव आणि नवरी आरती कुमारी (१८ वर्षे) स्टेजवर उपस्थित होते आणि विधी पार पाडले जात होते. याच दरम्यान शेजारीच राहणारा दीनबंधू मल्लाह आपलं तोंड बांधून अचानक स्टेजवर चढला. कोणाला काही समजण्यापूर्वीच त्याने पिस्तुल बाहेर काढलं आणि आरतीवर गोळी झाडली. या घटनेनंतर तो माथेफिरू गर्दीचा फायदा घेऊन घटनास्थळावरून फरार झाला.
नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दीनबंधू आरतीवर एकतर्फी प्रेम करत होता. आरतीचं लग्न इतर कोणाशी व्हावं, अशी त्याची इच्छा नव्हती. त्याने यापूर्वीही या लग्नाला विरोध केला होता आणि धमकीही दिली होती. त्याने म्हटलं होतं की- "जर ती माझी झाली नाही, तर मी तिला कोणाचीच होऊ देणार नाही." जेव्हा आरतीच्या कुटुंबीयांनी त्याचं ऐकलं नाही, तेव्हा त्याने बदला घेण्यासाठी लग्नाच्या दिवशीच हा भयानक कट रचला.
गोळी लागल्यानंतर नवरीला तातडीने सदर रुग्णालयात नेण्यात आलं, तिथे प्राथमिक उपचारानंतर तिची नाजूक अवस्था पाहून डॉक्टरांनी तिला ट्रॉमा सेंटर, वाराणसी येथे हलवण्याचा सल्ला दिला आहे. सध्या आरतीची प्रकृती चिंताजनक असून ती मृत्यूशी झुंज देत आहे. मुफस्सिल पोलीस ठाण्याने घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला आहे. अप्पर पोलीस निरीक्षक चंदन कुमार यांनी सांगितलं की, हे प्रकरण स्पष्टपणे एकतर्फी प्रेम प्रकरण आणि मानसिक विकृतीशी संबंधित आहे. पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली असून त्याच्या अटकेसाठी अनेक ठिकाणी छापे टाकले जात आहेत.