फेसबुक प्रेमाचा रक्तरंजित अंत! ब्युटी पार्लर मालकिणीची निर्घृणपणे हत्या; प्रियकरानेही संपवलं आयुष्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 12:43 IST2026-03-26T12:34:42+5:302026-03-26T12:43:21+5:30
कोलकात्यात एका पार्लर चालवणाऱ्या महिलेची तिच्याच प्रियकराने हत्या केल्याची घटना समोर आली आहे.

फेसबुक प्रेमाचा रक्तरंजित अंत! ब्युटी पार्लर मालकिणीची निर्घृणपणे हत्या; प्रियकरानेही संपवलं आयुष्य
Kolkata Crime: सोशल मीडियावरून झालेल्या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले, पण याच प्रेमाचा शेवट इतका भयानक होईल, याची कल्पना कोणीही केली नव्हती. कोलकात्याच्या गरिया परिसरातील महामयतला येथे एका ५० वर्षीय ब्युटी पार्लर मालकिणीची भरदिवसा पार्लरमध्येच गळा चिरून हत्या करण्यात आली. आरोपीने महिलेची हत्या केल्यानंतर स्वतःचाही गळा कापून आत्महत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली.
रूपबानी दास (५०) या गेल्या १५ वर्षांपासून महामयतला येथे स्वतःचे ब्युटी पार्लर चालवत होत्या. मंगळवारी दुपारी १२:०५ च्या सुमारास त्यांचे पती अनुप दास यांनी त्यांना पार्लरवर सोडले. रूपबानी पार्लरमध्ये पोहोचल्यानंतर काही वेळातच हरियाणातील रोहतकचा रहिवासी असलेला पंकज नाथ (४४) तिथे दाखल झाला. पंकजला पाहताच रूपबानी यांनी त्याला बाहेर जाण्यास सांगितले, मात्र त्याने नकार दिला. यावरून दोघांमध्ये जोरदार भांडण सुरू झाले.
बचावासाठी ब्लेडचा वापर, पण...
दोघांमधील वाद इतका विकोपाला गेला की पंकजने रूपबानी यांच्यावर हल्ला केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रूपबानी यांनी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पार्लरमधील एक ब्लेड उचलले आणि पंकजवर वार केले. पंकजच्या अंगावर असलेल्या जखमांवरून हे स्पष्ट होते की रूपबानी यांनी शेवटपर्यंत लढा दिला. मात्र, पंकजने त्यांच्याकडून तेच ब्लेड हिसकावून घेतले आणि त्यांच्या गळ्यावर खोलवर वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या रूपबानी यांचा जागीच मृत्यू झाला.
आरोपीची घटनास्थळीच आत्महत्या
रूपबानी यांची हत्या केल्यानंतर पंकजने त्याच ब्लेडने स्वतःचा गळा कापला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेला पंकज शटरपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याआधीच त्याने प्राण सोडले. पोलिसांनी घटनास्थळावरून दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.
फेसबुकवर झाली होती ओळख
तपासात समोर आले की, रूपबानी आणि पंकज यांची ओळख काही वर्षांपूर्वी फेसबुकवर झाली होती. ओळखीचे रूपांतर मैत्रीत आणि नंतर प्रेमात झाले. काही महिन्यांपूर्वी पंकजच्या सांगण्यावरून रूपबानी हरियाणा येथे गेल्या होत्या. पंकजने त्यांना तिथे व्यवसायात मोठी प्रगती करून महिना १ लाख रुपये कमवण्याचे आमिष दाखवले होते. मात्र, तिथे गेल्यानंतर त्यांचे संबंध बिघडले आणि रूपबानी पुन्हा कोलकात्याला परतल्या.
कुटुंबाला होता संशय?
रूपबानी यांचे काका अमरेंद्र दास यांनी सांगितले की, कुटुंबाला पंकजबद्दल माहिती होती. गेल्या काही दिवसांपासून रूपबानी यांच्या वागण्यात बदल झाला होता आणि त्यांचे पती त्यांना रोज पार्लरवर सोडायला जाऊ लागले होते, यावरून त्यांना पंकजकडून धोका असल्याची भीती असावी, असा संशय पोलिसांना आहे.
पार्लरमधील ब्लेडचा वापर झाला असल्याने, ही हत्या पूर्वनियोजित नसावी, तर वादातून अचानक घडलेली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. घटनेच्या वेळी पार्लरमधील एका कर्मचाऱ्याने आरडाओरडा ऐकून आरडाओरडा केला होता, पण पंकजने तिला बाहेर हाकलून लावले होते.