नवऱ्याच्या फोनवरील OTP ने उलगडलं २ वर्षांपूर्वीच्या 'मर्डर'चं रहस्य; 'ती' होती जिवंत, कारण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 11:29 IST2026-02-11T11:27:53+5:302026-02-11T11:29:06+5:30
एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या दोन वर्षांपासून पोलीस ज्या महिलेच्या हत्येचं रहस्य उलगडण्याचा प्रयत्न करत होते, ती महिला अचानक जिवंत असल्याचं आता समोर आलं.

फोटो - ABP News
उत्तर प्रदेशमधील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या दोन वर्षांपासून पोलीस ज्या महिलेच्या हत्येचं रहस्य उलगडण्याचा प्रयत्न करत होते, ती महिला अचानक जिवंत असल्याचं आता समोर आलं. ज्या महिलेच्या हत्येचा तपास सुरू होता, ती महिला दुसऱ्या राज्यात एका दुसऱ्या व्यक्तीसोबत सुखाने संसार करत असेल, याची पुसटशी कल्पनाही पोलिसांना नव्हती. आता ती महिला सापडली आहे.
कप्तानगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिलखाये गावात ही घटना घडली आहे. प्रियंका प्रजापती हिचं २०१७ मध्ये संदीपसोबत लग्न झालं होतं. त्यांना एक मुलगाही आहे. आठ वर्षे सर्व काही सुरळीत चाललं होतं, मात्र त्यानंतर दोघांमध्ये खटके उडू लागले. दोन वर्षांपूर्वी प्रियंका पतीवर रागावून लाखो रुपयांचे दागिने आणि मुलाला सोबत घेऊन माहेरी आली. त्यानंतर काही तासांतच ती मुलासह माहेरूनही निघून गेली.
आत्महत्येचा विचार सोडून थाटला नवा संसार
प्रियंकाचं म्हणणं आहे की, ती घरातून आत्महत्या करण्यासाठी बाहेर पडली होती. तिने अनेकदा आत्महत्येचा प्रयत्न केला पण तिची हिंमत झाली नाही. अखेर ती अयोध्येला रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी पोहोचली. तिथे तिची भेट राजस्थानच्या मंगल चंद्र नावाच्या व्यक्तीशी झाली. काही दिवसांतच तिने आत्महत्येचा विचार सोडून मंगलसोबत नवीन आयुष्य जगण्याचा निर्णय घेतला.
चार जणांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल
पत्नी आणि मुलगा अचानक बेपत्ता झाल्याने पती संदीप निराश झाला होता. संदीपने जेव्हा प्रियंकाच्या माहेरी जाऊन चौकशी केली, तेव्हा काही लोकांनी त्याला सांगितलं की, दागिन्यांच्या हव्यासापोटी तिच्या वडिलांनीच प्रियंका आणि मुलाची हत्या करून मृतदेह सरयू नदीत फेकून दिला आहे. या माहितीच्या आधारे संदीपने नोव्हेंबर २०२४ मध्ये प्रियंकाचे वडील दयाराम, आई सुभावती देवी यांच्यासह चार जणांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला.
मोबाईलवरील मेसेजने झाला खुलासा
एके दिवशी संदीपच्या मोबाईलवर प्रियंकाचे आधार कार्ड आणि फोटो बदलण्यासाठी एक OTP मेसेज आला. हा मेसेज पाहून संदीपला संशय आला आणि त्याने तात्काळ पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी तपास केला असता, आधार कार्डमधील फोटो बदलण्यासाठी राजस्थानमधून अर्ज करण्यात आल्याचं समजलं. या धाग्यादोऱ्यांचा पाठलाग करत पोलीस प्रियंकापर्यंत पोहोचले.
पत्नी होती जिवंत
संदीपचा मुलगाही तिच्यासोबतच होता. या सर्व प्रकाराचा खुलासा झाला असला तरी, आता या कथेत एक नवीन वळण आलं आहे. पत्नीने दिलेल्या या धक्क्यामुळे पती संदीप आता प्रियंकाला सोबत ठेवायला तयार नाही. तसेच तिचे आई-वडील, ज्यांनी हत्येचा खोटा आरोप सहन केला, तेही तिला स्वीकारण्यास नकार देत आहेत. दुसरीकडे प्रियंकालाही तिच्या नवीन पतीसोबत म्हणजेच मंगलसोबतच राहायचे आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.