९ वर्षांच्या प्रेमाचा क्रूर शेवट! पती जुगारात २० हजार हरला, लग्नानंतर २ महिन्यांत पत्नीने काटा काढला
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2026 13:04 IST2026-02-01T13:03:53+5:302026-02-01T13:04:49+5:30
नात्यातील दुरावा आणि ९ वर्षांच्या प्रेमाचा शेवट एका क्रूर हत्येने झाल्याची धक्कादायक घटना बरेलीमध्ये उघडकीस आली आहे.

फोटो - आजतक
नात्यातील दुरावा आणि ९ वर्षांच्या प्रेमाचा शेवट एका क्रूर हत्येने झाल्याची धक्कादायक घटना बरेलीमध्ये उघडकीस आली आहे. ज्या जितेंद्रने आपल्या प्रेमासाठी ९ वर्षे वाट पाहिली, त्याच पत्नीने त्याची गळा दाबून हत्या केली. शेजाऱ्यांना संशय येऊ नये म्हणून तिने पतीच्या आत्महत्येची अफवा पसरवली, मात्र पोलिसांनी तपास सुरू करताच सत्य समोर आलं.
बरेलीच्या इज्जतनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कैलाशपुरम कॉलनीमध्ये जितेंद्र यादव राहत होता. नातेवाईकांच्या सांगण्यावरून सुरुवातीला पोलिसांनीही ही आत्महत्या असल्याचं मानलं, परंतु शवविच्छेदन अहवालाने घटनेला पूर्णपणे कलाटणी दिली. अहवालात जितेंद्र यांची गळा दाबून हत्या झाल्याचे स्पष्ट झाले.
सोमवारी सकाळी जेव्हा पोलीस घटनास्थळी पोहोचले, तेव्हा जितेंद्र यांचा मृतदेह मफलरच्या साहाय्याने लटकलेला होता. सुरुवातीला पोलिसांनी याला आत्महत्या मानले होते, पण फॉरेन्सिक टीम आणि पोस्टमॉर्टम रिपोर्टने स्पष्ट केलं की, ही आत्महत्या नसून ही हत्या आहे आणि खुन्याला वाचवण्यासाठी मृतदेह लटकवण्यात आला होता.
जितेंद्रच्या कुटुंबीयांनी पत्नी ज्योतीवर गंभीर आरोप केले आहेत. रोडवेजमध्ये कंडक्टर असलेल्या ज्योतीने लग्नानंतर जितेंद्रवर वडिलोपार्जित मालमत्ता विकण्यासाठी दबाव टाकला होता. तिला स्वतःच्या नावावर शहरत घर आणि गाडी हवी होती. असं न केल्यास ती हुंडा छळाच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत असे.
९ वर्षांच्या प्रेमसंबंधानंतर झालेल्या लग्नात अवघ्या दोन महिन्यातच ज्योतीचं असं रूप समोर येईल याची कल्पना जितेंद्रने केली नव्हती. त्यातच जितेंद्र जुगारात २० हजार रुपये हरल्यामुळे रागाच्या भरात ज्योतीने त्याची हत्या केल्याचाही दावा केला जात आहे.
पोलिसांनी जितेंद्र आणि ज्योतीचे कॉल डिटेल्स (CDR) तपासले तेव्हा समजले की, घटनेच्या वेळी ज्योतीने शेवटचा कॉल आपल्या माहेरच्या लोकांना केला होता. पुरावे नष्ट करण्यासाठी माहेरच्या मंडळींनीही तिला मदत केल्याचा संशय पोलिसांना आला. सीसीटीव्ही फुटेज आणि लोकेशन ट्रेस केल्यावर पोलिसांचा संशय बळावला.
बरेलीचे एसएसपी अनुराग आर्य यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सखोल चौकशी केली. याच दरम्यान धक्कादायक खुलासा झाला आहे. अखेर, इज्जतनगर पोलिसांनी पत्नी ज्योतीसह तिच्या कुटुंबातील एकूण ३ जणांना हत्येच्या आरोपाखाली अटक केली आहे.