बिलाच्या वादातून घर मालकाची तर चारित्र्याच्या संशयातून पत्नीची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2024 08:25 AM2024-05-06T08:25:33+5:302024-05-06T08:25:41+5:30
शिवाजीनगर, मालवणीतील दोन्ही घटनांप्रकरणी गुन्हा दाखल
![A house owner was killed due to a dispute over a bill and his wife was killed due to suspicion of character | बिलाच्या वादातून घर मालकाची तर चारित्र्याच्या संशयातून पत्नीची हत्या A house owner was killed due to a dispute over a bill and his wife was killed due to suspicion of character | बिलाच्या वादातून घर मालकाची तर चारित्र्याच्या संशयातून पत्नीची हत्या](https://d3pc1xvrcw35tl.cloudfront.net/images/840x630/crime-scene5_2024051225138.jpg)
बिलाच्या वादातून घर मालकाची तर चारित्र्याच्या संशयातून पत्नीची हत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : लाईट भरण्याच्या वादातून भाडेकरूने मालकाची हत्या केल्याची घटना शिवाजीनगरमध्ये घडली. तर मालवणीत चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी शिवाजीनगर व मालवणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.
या हल्ल्यात गणपती शारदानंद झा (४९) यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या घरात अब्दुल शेख हा भाडेतत्त्वावर राहण्यास असून त्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. ३० तारखेला सकाळी अकराच्या दरम्यान दोघांमध्ये लाईट बिल भरण्याच्या कारणावरून वाद झाला. याच भांडणाच्या रागात अब्दुल सुभान मेनामुल्ला शेख याने लाकडी दांडक्याने मारहाण केली.
अपमृत्यूची नोंद करत तपास सुरू
यावेळी झा यांनी मारहाणीला विरोध करताच शेखने लोखंडी हातोडी त्यांच्या तोंडावर मारली. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. त्यांना राजावाडी रुग्णालयात नेले. तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. सुरुवातीला पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करत तपास सुरू केला. पुढे, त्यांचे सखे भाऊ दिनेश झा (६१) यांना झालेला मारहाणीबाबत समजताच त्यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवत आरोपीला अटक केली.
हत्येचा गुन्हा नोंदवत आरोपीला अटक
मालाड परिसरात राहणाऱ्या श्रवणकुमार धयानी राऊत (४२) यांनी पत्नी सपना यांच्या चारित्र्यावर संशय त्यांची हत्या केली. याप्रकरणी मुलगी श्वेता (१५) हिच्या तक्रारीवरून पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवत आरोपीला अटक केली आहे. श्रवणकुमार हा भाजी विक्रीचा व्यवसाय करतो. शनिवारी नेहमीप्रमाणे पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत त्यांच्यात वाद झाले. याच रागात भाजी विक्रीसाठी असलेल्या चाकूने त्याने पत्नीवर वार केल्याने खळबळ उडाली आहे.