३० लाखांचा खर्च, १५ लाखांचा हुंडा; पाठवणीनंतर नवरीला समजलं IAS नवऱ्याचं 'ते' धक्कादायक सत्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 11:02 IST2026-03-23T11:01:26+5:302026-03-23T11:02:28+5:30
कुटुंबाने आपल्या मुलीचं लग्न स्वतःला आयएएस (IAS) अधिकारी सांगणाऱ्या व्यक्तीशी मोठ्या थाटामाटात लावून दिलं. मात्र पाठवणीनंतर काही तासांतच जे सत्य समोर आलं, त्याने संपूर्ण कुटुंबाला हादरलं आहे.

३० लाखांचा खर्च, १५ लाखांचा हुंडा; पाठवणीनंतर नवरीला समजलं IAS नवऱ्याचं 'ते' धक्कादायक सत्य
गोरखपूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे, जिथे एका कुटुंबाने आपल्या मुलीचं लग्न स्वतःला आयएएस (IAS) अधिकारी सांगणाऱ्या व्यक्तीशी मोठ्या थाटामाटात लावून दिलं. मात्र पाठवणीनंतर काही तासांतच जे सत्य समोर आलं, त्याने संपूर्ण कुटुंबाला हादरलं आहे. कँट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोहद्दीपूर भागात राहणारं एक कुटुंब आपल्या मुलीसाठी चांगल्या स्थळाच्या शोधात होतं.
एका मॅट्रिमोनिअल ग्रुपच्या माध्यमातून प्रीतम कुमार निषाद नावाच्या तरुणाचं स्थळ आलं. या तरुणाने तो आयएएस अधिकारी असल्याचं सांगितलं आणि आपली पोस्टिंग माणिकपूर येथे असल्याचं भासवलं. कुटुंबाचा विश्वास संपादन करण्यासाठी त्याने बनावट इंटरव्ह्यूचे व्हिडीओ, ऑफिसचे फोटो आणि काही नेत्यांसोबतचे आपले फोटोही शेअर केले. हे सर्व पाहून कुटुंबाची खात्री पटली की, आपल्या मुलीचं नातं एका प्रतिष्ठित अधिकाऱ्याशी जुळत आहे. विशेष म्हणजे सुरुवातीला या तरुणाने आपण हुंडा न घेता लग्न करणार असल्याचं सांगून कुटुंबाचा अधिकच विश्वास जिंकला.
हुंड्यासाठी १५ लाखांची मागणी
लग्न ठरल्यानंतर तयारी जोरात सुरू झाली. मात्र साखरपुड्याच्या काही काळ आधी तरुणाने अचानक लग्नाच्या खर्चाच्या नावाखाली १५ लाख रुपयांची मागणी केली. नातं तुटण्याच्या भीतीने आणि सामाजिक प्रतिष्ठेपोटी कुटुंबाने ही मागणी मान्य केली. साखरपुड्याच्या दिवशी १० लाख रुपये रोख देण्यात आले, तर उर्वरित ५ लाख रुपये नंतरच्या कार्यक्रमात देण्यात आले. आपली पोस्टिंग बाहेर असते, त्यामुळे संसाराचं सामान नंतर द्या, असं सांगून त्याने कुटुंबाला गाफील ठेवलं.
३० लाखांचा खर्च आणि दिमाखदार सोहळा
११ मार्च २०२६ रोजी नंदा नगर येथील एका मॅरेज लॉनमध्ये हा विवाहसोहळा सर्व रितीरिवाजांनुसार पार पडला. मोहद्दीपूरमधील एका हॉटेलमध्ये पाहुण्यांची विशेष व्यवस्था करण्यात आली होती. मुलीच्या वडिलांच्या मते या लग्नात तब्बल ३० लाख रुपये खर्च झाले. १२ मार्च रोजी मुलीची पाठवणी झाली. मात्र काही तासांतच एका फोनने सर्व काही बदलून टाकलं. लग्नात सहभागी झालेल्या एका व्यक्तीने नवरीला सांगितलं की, तिचा पती कोणताही आयएएस अधिकारी नाही. हे ऐकताच नवरीच्या पायाखालची जमीन सरकली आणि तिने तातडीने आपल्या वडिलांना फोन केला.
एका खोलीत राहणारा तोतया अधिकारी फरार
मुलीचा फोन येताच कुटुंबीय वेळ न घालवता इटावा येथे पोहोचले. तिथे आरोपीने दिलेल्या पत्त्यावर गेल्यावर त्यांना धक्काच बसला. ज्याला ते आयएएस अधिकारी समजत होते, तो एका छोट्याशा भाड्याच्या खोलीत राहत होता. तिथे कोणतीही सरकारी सुविधा किंवा अधिकाऱ्यासारखं वातावरण नव्हतं. कुटुंबीयांना पाहताच आरोपी आपल्या बहिणीसह तिथून पसार झाला. या फसवणुकीमुळे मुलीच्या कुटुंबाला मोठा मानसिक आणि आर्थिक धक्का बसला आहे.