26/11 Terror Attack : सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर बांधलेले बंकर गेले कुणीकडे ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2018 15:12 IST2018-11-25T15:11:21+5:302018-11-25T15:12:48+5:30
संशयास्पद व्यक्तींवर करडी नजर ठेवण्यासाठी शहरभर सुमारे १८० बंकर उभारण्यात आले होते. मात्र हे बंकर आता नामशेष झालेले चित्र पाहायला मिळत आहे

26/11 Terror Attack : सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर बांधलेले बंकर गेले कुणीकडे ?
मुंबई - १० वर्षांपूर्वी मुंबईतील झालेल्या २६/११ या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षाव्यवस्था हा अत्यंत महत्त्वाचा व चर्चेचा विषय ठरला होता असून सुरक्षेचा उपाय म्हणून संशयास्पद व्यक्तींवर करडी नजर ठेवण्यासाठी शहरभर सुमारे १८० बंकर उभारण्यात आले होते. मात्र हे बंकर आता नामशेष झालेले चित्र पाहायला मिळत आहे.
२६/११ दहशतवादी हल्ल्यानंतर मुंबई पोलीस अनेक बदल करण्यात आले. प्रत्येक पोलीस ठाण्यात एटीसी (अँटी टेररिस्ट सेल) ची स्थापना करण्यात आली. फोर्स १ घडण करण्यात आली असे अनेक बदल झालेत. त्याचप्रमाणे दहशतवादी कारवाया आणि गुन्हेगारीला वचक बसविण्यासाठी खाकी वर्दीतील शस्त्रधारी पोलीस बंकरआडून समाजकंटकांवर करडी नजर ठेवत होते. मात्र, काही वर्षांनंतर हे बंकर मुंबई शहरातून गायब झाले आहेत. या बंकरसाठी मुंबई पोलीस दलाने लाखो रुपये खर्च केले होते. मुंबईतील अतिसंवेदनशील आणि संवेदनशील ठिकाणी या बंकरची उभारणी करण्यात आली होती. त्याचप्रमाणे रेल्वे स्थानकांवरही बंकर उभारण्यात आले होते. मात्र, कालांतराने पहाऱ्यासाठी उभारलेल्या बंकर्समध्ये साचलेला कचरा, बंद पडलेले मेटल डिटेक्टर्स, भिकारी-गर्दुल्ल्यांचे अड्डे अशा अवस्थेत बंकर्स दिसत होते.
रेल्वे स्थानकांचीच्या सुरक्षेची जबाबदारी रेल्वे पोलिस, जीआरपी, होमगार्ड, सुरक्षा रक्षक मंडळ आणि खासगी सुरक्षारक्षक अशा पाच यंत्रणांवर आहे. २६ नोव्हेंबर २००८च्या हल्ल्यानंतर सर्व स्थानकांत बंकर्स उभारण्यात आले. मात्र बहुतांश बंकर्स उद्ध्वस्त झाले आहेत. काही बंकर्सना तर कचराकुंड्यांचे स्वरूप आले आहे. त्यामुळे २६/११ चा धसका घेऊन उभारलेले बंकर्स गेले कुठे ? पोलीस दलातील कमी मनुष्यबळामुळे बंकर्स बंद पडले का ? असे अनेक सवाल उपस्थित होत आहेत.