अजिंठा घाटात तिहेरी अपघातानंतर ४ तास वाहतूक ठप्प; दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 12:35 IST2025-06-24T12:34:28+5:302025-06-24T12:35:41+5:30
तिहेरी अपघाताची ही घटना घडल्यानंतर या परिसरात पावसाची रिपरिप सुरू झाली. त्यामुळे दुचाकी व अन्य वाहनचालकांचे मोठे हाल झाले.

अजिंठा घाटात तिहेरी अपघातानंतर ४ तास वाहतूक ठप्प; दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा
सिल्लोड : अजिंठा-जळगाव राष्ट्रीय महामार्गावरील अजिंठा घाटात सोमवारी (ता. २३) दुपारी सुमारे २ वाजेच्या सुमारास एक ट्रक नालीमध्ये गेल्यानंतर त्यामागे असलेला हायवा कठड्याला धडकला. यामुळे तो रस्त्यावर आडवा झाला. त्याला जाऊन एक कंटेनर धडकला. या तिहेरी अपघातामुळे जवळपास ४ तास अजिंठा घाटात वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे या महामार्गाच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
याबाबत प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, घाट उतरत असताना, एका ट्रकचालकाने वाहनावरील नियंत्रण सुटल्याने तो रस्त्याच्या बाजूला असलेल्या नालीत गेला. त्यानंतर काही वेळातच पाठीमागून आलेल्या हायवा चालकाने समोरून जाणाऱ्या एका वाहनाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला असता, त्यास अचानक पुढील घसरलेला ट्रक दिसल्याने जोरात ब्रेक दाबले. त्यामुळे हायवावरील नियंत्रण सुटले आणि हायवा घाटाच्या कठड्यावर आदळून रस्त्यावर आडवा झाला. त्याला जाऊन एक कंटेनर धडकला सुदैवाने या तिहेरी अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. या अपघातामुळे दुपारी २ वाजेपासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत ४ तास वाहतूक ठप्प झाली होती.
वाहनधारकांचे मोठे हाल
तिहेरी अपघाताची ही घटना घडल्यानंतर या परिसरात पावसाची रिपरिप सुरू झाली. त्यामुळे दुचाकी व अन्य वाहनचालकांचे मोठे हाल झाले. प्रवाशांना तासन्तास अडकून बसावे लागले. या घटनेची माहिती मिळताच अजिंठा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व वाहतूक सुरळीत केली.