छत्रपती संभाजीनगरहून हैदराबादचे विमान ७० टक्के ‘फुल्ल’, मग का होतेय विमानसेवा बंद?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 14:10 IST2025-06-17T14:05:09+5:302025-06-17T14:10:01+5:30
महिन्याला ७ हजारांवर विमान प्रवासी, जुलैपासून सकाळचे विमान होणार बंद

छत्रपती संभाजीनगरहून हैदराबादचे विमान ७० टक्के ‘फुल्ल’, मग का होतेय विमानसेवा बंद?
छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरहून महिन्याला ७ हजारांवर प्रवासी विमानाने हैदराबादला ये-जा करीत आहेत. हैदराबादचे विमान ७० टक्के प्रवाशांनी भरून जात आहे. तरीही इंडिगोने हैदराबादचे सकाळच्या वेळेतील १ विमान बंद करण्याचा निर्णय घेतल्याने प्रवाशांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
छत्रपती संभाजीनगरहून सकाळच्या वेळेत सुरू असलेली इंडिगोची हैदराबादची विमानसेवा १ जुलैपासून बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही विमानसेवा ‘ऑपरेशनल रिझन’मुळे १ जुलै ते २५ ऑक्टोबर दरम्यान रद्द करण्यात येत असल्याचे कारण इंडिगोने दिले आहे. त्यामुळे आता हैदराबादला जाण्यासाठी केवळ सायंकाळच्या वेळेत विमानसेवा उपलब्ध राहणार आहे.
निर्णयाचा तातडीने पुनर्विचार करा
इंडिगो कंपनीच्या निर्णयामुळे स्थानिक नागरिक, उद्योजक आणि पर्यटकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. या निर्णयाचा तातडीने पुनर्विचार करावा, अशी मागणी एका निवेदनाद्वारे करण्यात आल्याचे औरंगाबाद टुरिझम डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या (एटीडीएफ) सिव्हिल एव्हिएशन कमिटीचे अध्यक्ष सुनीत कोठारी यांनी इंडिगोकडे केली आहे.
दरमहा किती प्रवासी?
महिना- प्रवाशांची संख्या - आसन क्षमतेच्या तुलनेत टक्केवारी
जानेवारी २०२४- ७,४५४ - ७७.०७ %
फेब्रुवारी २०२४- ७,०३७ - ७७.७७ %
मार्च २०२४- ७,६७२ - ७९.३२ %
एप्रिल २०२४- ६,८७५ - ७३.४५ %
मे २०२४- ८,०१० - ८२.८२ %
जून २०२४- ७,२५४- ७७.५० %
जुलै २०२४- ७,५४० - ७७.९६ %
ऑगस्ट २०२४- ७,६१३ - ७८.७१ %
सप्टेंबर २०२४- ७,१२३ - ७६.१० %
ऑक्टोबर २०२४- ७,६९१- ८०.८२ %
नोव्हेंबर २०२४- ८,३९५ - ८९.६९ %
डिसेंबर २०२४- ८,७०५ - ९०.०० %
जानेवारी २०२५- ८,६८३ - ८९.७७ %
फेब्रुवारी २०२५- ८,०४४ - ९२.०८ %
मार्च २०२५- ८,३५१ - ८६.३४ %
एप्रिल २०२५ - ८,१०५ - ८६.५९ %
हैदराबादचे विमान सुरळीत सुरू राहील
हैदराबादकडे जाणाऱ्या विमानासाठी प्रवासी भरपूर आहेत. इंडिगोच्या सीईओ सचदेवा यांना भेटून विमानसेवा पूर्ववत ठेवण्यासाठी सांगणार आहे. विमानतळ जास्त आणि विमानांची संख्या कमी असल्यामुळे अडचणी आहेत. इंडिगो आणि एअर इंडियाने एअरबस या कंपनीकडे प्रत्येकी ४०० विमानांची मागणी नोंदविली आहे. विमान मिळताच सेवा सुरळीत होऊन नवीन कनेक्टिव्हिटी मिळेल.
- डॉ. भागवत कराड, खासदार