फक्त ३० वर्षांत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इमारतीचे आयुष्य संपले
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 15:00 IST2025-05-30T14:53:48+5:302025-05-30T15:00:03+5:30
६९८ दुकानांचे होणार स्ट्रक्चरल ऑडिट, अडत व्यापारी आक्रमक; सभापती व व्यापाऱ्यांची सोमवारची बैठक गाजणार

फक्त ३० वर्षांत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इमारतीचे आयुष्य संपले
छत्रपती संभाजीनगर : जाधववाडी येथील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीमधील धान्य व फळ भाजीपाला अडत मार्केटमधील ६९८ दुकानांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला होता. त्यानुसार सेल हॉल क्र. ५ चा ऑडिट अहवाल आला आहे. येथील गाळे धोकादायक बनले असून स्लॅब व भिंत कधीही पडू शकते असे त्यात म्हटले आहे. केवळ ३० वर्षांपूर्वीच बांधलेल्या कृषी समितीतील इमारतीचे बांधकाम दर्जाहीन असल्याचे समोर आले आहे.
जुन्या मोंढ्यात अपुरी जागा पडत असल्याने धान्याच्या अडत बाजाराचे स्थलांतर जाधववाडी येथील कृउबाच्या जागेवर १९९८-९९ मध्ये झाले. शहागंजातील फळभाजीपाला अडत बाजाराचे स्थलांतर २००० मध्ये करण्यात आले. धान्याच्या अडत बाजारात ५ सेल हॉल आहेत. त्यात १८०, जनरल शॉपीमध्ये ३९८ तर फळ-भाजीपाला अडत बाजारात १८० दुकाने असे सर्व मिळून ६९८ दुकाने आहेत. हे बांधकाम १९९५-९६ ला झाले होते. धान्याच्या अडत बाजारातील सेल हॉल क्र. ५ मधील काही दुकानांच्या स्लबचे प्लॉस्टर कोसळून एका लोडिंग रिक्षाचे नुकसान झाले. रिक्षामालकाने कृउबा समितीकडे नुकसानभरपाई मागितली होती.
त्यातून पुढे चालून मोठी दुर्घटना घडू नये यासाठी ३१ जानेवारी २०२५ ला संचालकांच्या बैठकीत सेल हॉल क्र ५ च्या स्ट्रक्चरल ऑडिटचा निर्णय घेण्यात आला. २४ एप्रिलला ऑडिटचे काम खासगी फर्मला दिले. त्यांनी दुकानांचा ऑडिट रिपोर्ट ३ मे रोजी कृउबाला सादर केला. त्यात इमारती धोकादायक बनल्याचे म्हटले आहे. यामुळे बाजार समितीने धान्य अडत बाजारातील १ ते ४ सेल हॉल तसेच जनरल शॉपिंग व फळ भाजीपाला अडत बाजारातील दुकानांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय घेतला आहे. सेल हॉल ५ मधील धान्याच्या अडत व्यापाऱ्यांना नोटीस देऊन चर्चा करण्यासाठी ३ जूनला सकाळी ११ वाजता बैठक बोलविण्यात आली. ही नोटीस प्राप्त होताच अडत्यांमध्ये संतापाचे वातावरण पसरले. आम्ही दुकाने पाडून देणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला. यामुळे बैठक गाजणार असे चिन्ह दिसू लागले आहे.
बैठकीसाठी नोटीस पाठविली
बांधकाम पाडून टाकण्यासाठी नोटीस पाठविली नाही तर चर्चा करण्यासाठी व्यापाऱ्यांची बैठक बोलविली आहे. ती नोटीस कृउबाने पाठविली. सेल हॉल क्रमांक ५ धोकादायक बनला आहे. भविष्यात काही दुर्घटना घडल्यास कृउबा जबाबदार राहणार नाही.
- राधाकिसन पठाडे, सभापती, कृउबा, जाधववाडी
आमची दुकाने पाडू देणार नाही
कृउबाने स्ट्रक्चरल ऑडिट केले, तरी आम्ही सुद्धा स्ट्रक्चरल ऑडिट करु. वेळ प्रसंगी न्यायालयात जाऊ, पण आमची दुकाने पाडू देणार नाही. आम्ही आंदोलन केल्याने कृउबा संचालक सुडबुद्धीने वागत आहे.
- संजय पहाडे, अडत व्यापारी