टीबी केवळ फुफ्फुसांचाच नव्हे, तर मेंदू आणि पोटाचाही असू शकतो; अशी ओळखा लक्षणे
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 20:01 IST2026-03-24T20:00:36+5:302026-03-24T20:01:34+5:30
जागतिक क्षयरोग दिन: लवकर निदान हीच टीबीवर मात करण्याची गुरुकिल्ली.

टीबी केवळ फुफ्फुसांचाच नव्हे, तर मेंदू आणि पोटाचाही असू शकतो; अशी ओळखा लक्षणे
छत्रपती संभाजीनगर : टीबी म्हटले की, डोळ्यासमोर फक्त खोकणारा रुग्ण उभा राहतो; पण प्रत्यक्षात हा आजार टीबी केवळ फुफ्फुसांपुरता मर्यादित नसून, मेंदू, पोटासह शरीरात शांतपणे वेगवेगळ्या ठिकाणीही घर करतो. त्यामुळे लक्षणे ओळखण्यात उशीर होतो आणि उपचारही लांबणीवर पडतात, ही चिंतेची बाब आहे.
दरवर्षी २४ मार्च रोजी ‘जागतिक क्षयरोग दिन’ पाळला जातो. यानिमित्ताने क्षयरोगाबाबत समाजात अजूनही असलेले गैरसमज दूर करून लवकर निदान व उपचारांचे महत्त्व पटवून देण्यावर भर देण्यात येत आहे.
क्षयरोग हा हवेतून पसरणारा संसर्गजन्य आजार असून, तो मुख्यतः फुफ्फुसांवर परिणाम करतो. योग्य वेळी उपचार सुरू केल्यास टीबी पूर्णपणे बरा होऊ शकतो. मात्र, उपचार अर्धवट सोडल्यास आजार गंभीर होण्याचा धोका असतो. ‘निक्षय मित्र’ योजनेच्या माध्यमातून नागरिक, संस्था आदींना टीबी रुग्णांना दत्तक घेऊन त्यांना पौष्टिक आहार देऊन आधार देता येतो. निक्षय मित्रांनी रुग्ण दत्तक घेण्याचे आवाहन शहर क्षयरोग अधिकारी डाॅ. प्रेरणा संकलेचा यांनी केले.
जिल्ह्यातील स्थिती
२०२४ मध्ये २ हजार ७४ तर २०२५ मध्ये १ हजार ९६५ रुग्ण आढळले. क्षयरुग्ण बरा होण्याचे प्रमाण २०२३ मध्ये ९३.०४ टक्के, तर २०२४ मध्ये ९५.६७ टक्के होते. मृत्यूदर २०२४ मध्ये २.४६ टक्के, तर २०२५ मध्ये १.९८ टक्के होता.
शहरातील स्थिती
शहरात २०२४ मध्ये ३ हजार ८८८ टीबी रुग्ण आढळले व १६७ रुग्णांचा मृत्यू झाला. २०२५ मध्ये ३ हजार ९१६ रुग्ण आढळले व १४४ जणांचा मृत्यू झाला.
टीबीची लक्षणे...
- दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ खोकला.
- खोकल्यातून रक्त.
- सतत ताप, विशेषतः संध्याकाळी.
- रात्री घाम येणे.
- वजन घटणे, भूक न लागणे.
- थकवा, अशक्तपणा.
निक्षय मित्र व्हावे
टीबीमुक्त होण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला जात आहे. तपासणीवर भर दिला जात आहे. पोर्टेबल एक्स-रे मशीनच्या मदतीनेही तपासणी केली जात आहे. टीबी रुग्णांसाठी नागरिकांनी ‘निक्षय मित्र’ व्हावे.
- डाॅ. पारस मंडलेचा, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, मनपा
मृत्यूदरात घट
टीबीमुक्त भारत अभियानांतर्गत २०२५ मध्ये अतिजोखमीच्या व्यक्तींची स्क्रीनिंग करण्यात आली. त्यामध्ये छातीचे एक्स-रे, तपासणी, ‘एनएएटी’ तपासणी करण्यात आली. क्षयरुग्णांच्या मृत्यूदरात घट आढळून आली.
- डाॅ. वैशाली डकले पाटील, जिल्हा क्षयरोग अधिकारी