पाण्यासाठी भटकंती थांबवा! गंगापूर पालिकेसमोर आंघोळ आंदोलन करून नागरिकांचा संताप
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 16:28 IST2025-06-16T16:27:41+5:302025-06-16T16:28:49+5:30
नियोजनशून्य कारभारामुळे कृत्रिम पाणीटंचाईचा सामना; आंदोलकांकडून पालिका प्रशासनाचा निषेध

पाण्यासाठी भटकंती थांबवा! गंगापूर पालिकेसमोर आंघोळ आंदोलन करून नागरिकांचा संताप
गंगापूर : शहराला पिण्याच्या पाण्यापासून वंचित ठेवणाऱ्या नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागाविरोधात सोमवारी (दि.१६) दुपारी अमोल जगताप मित्रमंडळाच्या वतीने आंघोळ आंदोलन करण्यात आले. नागरिकांची पाण्यासाठी भटकंती तत्काळ थांबविण्याची मागणी आंदोलकांनी यावेळी केली.
गोदावरी फुगवटा क्षेत्रात मुबलक पाणी असूनही गंगापूरवासीयांना पालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळे कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. शहराला पाणीपुरवठा करणारी १९ कोटी रुपयांची पाइपलाइन ही अतिशय निकृष्ट दर्जाची झालेली असताना देखील पाणीपुरवठ्याचे कोणतेही नियोजन केलेले नाही. शहरात अस्वच्छ व गढूळ पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उदभवत आहे. याविषयी पालिकेचे अनेकदा लक्ष वेधून देखील त्यावर कोणतीही उपायोजना होत नसल्याने या विरोधात सोमवारी दुपारी १ वाजता पालिकेच्या प्रांगणात जोरदार घोषणाबाजी करीत अंघोळ आंदोलन करून पालिका प्रशासनाच्या नियोजन शून्य कारभाराचा निषेध करण्यात आला.
आंदोलकांनी पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यातून पाणी आणून पालिकेच्या प्रांगणात अंघोळ केली. येत्या आठ दिवसात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा नियमित व शुद्ध पाणी न मिळाल्यास गनिमी कावा आंदोलन करण्यात येईल असा इशारा पालिका प्रशासनाला दिला. पालिकेच्या वतीने मुख्याधिकारी संतोष आगळे यांनी मागण्यांचे निवेदन स्वीकारले. आंदोलनस्थळी गंगापूर पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता. यावेळी अमोल जगताप, राहुल वानखेडे, वाल्मीक शिरसाठ, माजी उपनगराध्यक्ष खालेद नाहदी, रावसाहेब तोगे, ज्ञानेश्वर साबणे, अख्तर सय्यद, नवनाथ कानडे, हनीफ बागवान, गुलाम शहा, वैभव खाजेकर, राहुल खाजेकर, पृथ्वीराज तोगे, अमोल म्हसरूप आदी हजर होते.