धक्कादायक! चोवीत तासांत छत्रपती संभाजीनगरात चार जणांनी संपवले आयुष्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 17:25 IST2025-08-20T17:15:16+5:302025-08-20T17:25:01+5:30
शेतकरी, वाहनचालक, प्लंबरसह न्यायालयाच्या लिपिकाने उचलले टोकाचे पाऊल

धक्कादायक! चोवीत तासांत छत्रपती संभाजीनगरात चार जणांनी संपवले आयुष्य
छत्रपती संभाजीनगर : गेल्या चोवीस तासांत शहरात ४ जणांनी आत्महत्या करत आयुष्य संपवले. देवळाई, सातारा, जहांगीर कॉलनीसह गोलवाडी परिसरात या घटना उघडकीस आल्या. चारही घटनांत आत्महत्येचे नेमके कारण अस्पष्ट असले तरी वैयक्तिक, आर्थिक तसेच कौटुंबिक तणावातूनच चौघांनी हे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
मुलांना अभ्यास करण्यासाठी सांगून खोलीत गेले
साताऱ्यातील रोहिदासनगरात राहणाऱ्या रवींद्र बारकू कापडणीस (५०) यांनी गळफास घेतला. रवींद्र जिल्हा व सत्र न्यायालयात लिपिक होते. सोमवारी सायंकाळी न्यायालयातून घरी परतल्यानंतर त्यांनी कुटुंबासोबत जेवण केले. मुलांना ‘अभ्यास करा, मी खोलीत झाेपतो,’ असे सांगून ते त्यांच्या बेडरूममध्ये गेले. मंगळवारी सकाळी नेहमीची वेळ उलटल्यानंतरही रवींद्र उठले नसल्याने पत्नीने खिडकीतून पाहिले असता ते लटकलेल्या अवस्थेत आढळले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, पत्नी असा परिवार आहे. सातारा पोलिस ठाण्याचे सहायक फौजदार रज्जाक शेख अधिक तपास करीत आहेत.
भावाला शेवटचा कॉल करून आत्महत्या
मोठ्या भावाला शेवटचा काॅल करून तय्यब समद पठाण (२४) यांनी गळफास घेतला. खासगी वाहन चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणारे तय्यब काही दिवसांपासून जहांगीर कॉलनीत पत्नीसोबत राहत होते. त्याच भागात तय्यब यांचे सासरचे कुटुंबदेखील राहत होते. सोमवारी रात्री १० वाजता त्यांनी भावाला तणावातच शेवटचा कॉल करून आत्महत्या करीत असल्याचे सांगितले. भाऊ त्यांच्या घरी पोहोचेपर्यंत ते लटकलेल्या अवस्थेत आढळले. हर्सूल पोलिस अधिक तपास करीत आहेत.
कामावर जातो सांगून शेतात गळफास
कामावर जात असल्याचे सांगून प्लम्बिंगचे काम करणाऱ्या अमोल काकासाहेब लोखंडे (३३, रा. देवळाई) यांनी बाळापूर शिवारात एका झाडाला गळफास घेतला. मंगळवारी सकाळी ९:३० वाजता ही घटना उघडकीस आली. अमोल मंगळवारी नेहमीप्रमाणे सकाळी काम असल्याचे सांगून घराबाहेर पडले. त्यानंतर त्यांनी थेट बाळापूर शिवारातील शेतात जात झाडाला गळफास घेतला. त्यांचे मामा संतोष हिवाळे शेतात गेल्यानंतर त्यांना ही बाब निदर्शनास आली. अमोल यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी असा परिवार आहे. चिकलठाणा पोलिस ठाण्याचे अंमलदार निवृत्ती मदने तपास करीत आहेत.
चहा पिऊन क्षणात टोकाचे पाऊल
गोलवाडीमध्ये राहणारे ३० वर्षीय शेतकरी तुळजाराम सलामपुरे (३०) यांनी गळफास घेत आत्महत्या केली. मंगळवारी सकाळी त्यांनी नेहमीप्रमाणे कुटुंबातील सदस्यांसोबत चहा घेतला. त्यानंतर वरच्या मजल्यावर जात गळफास घेतला. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी असा परिवार आहे. छावणी पोलिस या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.