वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर उच्च न्यायालयात साडेसहा तास युक्तीवाद
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 19:31 IST2025-12-12T19:30:14+5:302025-12-12T19:31:33+5:30
आज सरकारी पक्षाचा युक्तीवाद अपूर्ण राहिल्याने पुढील सुनावणी आता १६ डिसेंबर रोजी ठेवण्यात आली आहे.

वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर उच्च न्यायालयात साडेसहा तास युक्तीवाद
छत्रपती संभाजीनगर: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जामीन अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर आज १२ डिसेंबर रोजी सकाळी ११ :३० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत सुनावणी झाली. आज सरकारी पक्षाचा युक्तीवाद अपूर्ण राहिल्याने पुढील सुनावणी आता १६ डिसेंबर रोजी ठेवण्यात आली आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी केज पोलीस ठाण्यात आरोपी वाल्मिक कराडसह त्याच्या साथीदारांवर खून आणि मकोका कायद्यानंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ३१ डिसेंबर २०२४पासून आरोपी कराड अटकेत आहे. याप्रकरणात जामिन मिळावा, यासाठी कराड याने औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे. न्यायमूर्ती सुशिल एम. घोडेस्वार यांच्या न्यायालयात ही याचिका आज सुनावणी आली. कराडच्यावतीने जेष्ठ विधीज्ञ शिरीष गुप्ते यांनी युक्तीवाद करताना नमूद केले की, कराडला अटकेची कारणे पोलिसांनी लेखी स्वरुपात दिले नाही.यामुळे त्याची अटकच बेकायदेशीर आहे. या गुन्ह्यात चुकीच्या पद्धतीने मकोका लावण्यात आला. मकोका आदेशाची मंजूरी ही चुकीच्या पद्धतीने देण्यात आली. तर कराडचा या घटनेशी काेणताही संबंध नाही. देशमुख यांच्या हत्येच्यावेळी तो घटनास्थळापासून शेकडो किलोमीटर दूर होता. खोट्या पद्धतीने कराडला या गुन्ह्यात गोवण्यात आला, त्याच्याविरोधात कोणताही पुरावा नसल्याचे नमूद करीत त्यास जामीन देण्याची विनंती करण्यात आली. कराडच्या वकिलांचा युक्तीवाद खोडून काढताना मुख्य सरकारी वकिल अमरजितसिंह गिरासे देशमुख हत्याकांडाचा संपूर्ण घटनाक्रम उलगडून दाखविला. प्रत्येक घटनेत साक्षीदार आहेत, सीडीआर रिपोर्ट, सीसीटीव्ही फुटेज आणि आरोपींची आपसातील ऑडिओ रेकॉर्डिंग सरकारी पक्षाकडे आहे.शिवाय या सर्व पुराव्यांना पुष्टी देणारे न्यायवैद्यक प्रयोगशाळेचे अहवाल आहेत.
पुढील सुनावणी मंगळवारी
कराड हाच या घटनेचा मुख्य सूत्रधार असून अवादा कंपनीकडे २ कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. खंडणी न दिल्याने कंपनी बंद करण्याचा प्रयत्न आरोपींनी केला. कंपनी बंद करू नका,रोजगार जाईल यासाठी सरपंच संतोष देशमुख यांनी विनंती केली. यामुळे चिडून जाऊन आरोपींनी त्यांचे अपहरण करुन निर्घृण हत्या केल्याचे गिरासे यांनी सांगितले. प्रत्यक्ष मारेकरी हे घटनेच्या वेळी आणि नंतर विष्णू चाटे आणि कराडच्या कायम संपर्कात होते,असे सांगितले. सकाळी साडेअकरा वाजता सुरू झालेली सुनावणी सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत सुरू होती.सरकारी पक्षाचा युक्तीवाद अपूर्ण राहिल्याने आता ही सुनावणी मंगळवारी ठेवण्यात आली आहे.
देशमुख यांची पत्नी आणि भाऊ यांना अश्रू अनावर
या सुनावणीदरम्यान सरकारी वकिलांनी जेव्हा देशमुख यांच्या मारहाणीचे २३ व्हिडिओ न्यायमूर्तींना लॅपटॉपवर दाखवले तेव्हा तेथे उपस्थित असलेले देशमुख यांची पत्नी अश्विनी आणि बंधू धनंजय यांना अश्रू अनावर झाले ते कोर्टहॉल बाहेर येऊन ओक्साबोक्सी रडले.