गुन्हेगाराला रिक्षा भाड्याने देणे भोवले; प्रवाशाच्या खून प्रकरणी चालकानंतर मालकाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 14:11 IST2025-06-16T14:11:04+5:302025-06-16T14:11:48+5:30
चालकाकडून महिला प्रवाशांसोबत गैरवर्तन, मद्यपान करून रिक्षा चालवल्यास, लुटमार, मारहाणीचे कृत्य झाल्यास रिक्षामालकही तेवढेच जबाबदार धरून कारवाई

गुन्हेगाराला रिक्षा भाड्याने देणे भोवले; प्रवाशाच्या खून प्रकरणी चालकानंतर मालकाला अटक
छत्रपती संभाजीनगर : शिक्षक पात्रता परीक्षेसाठी शहरात आलेल्या २८ वर्षीय जयराम बबन पिंपळे (रा. श्रीरामपूर) याची रिक्षाचालक मुजम्मिल रफीक कुरेशी (२२) याने क्रूर हत्या केली. गुन्हेगाराला कुठलीही शहानिशा न करता भाड्याने रिक्षा देऊन गुन्ह्यास अप्रत्यक्ष जबाबदार धरल्याचा ठपका ठेवत रिक्षामालक सय्यद मझरोद्दीन सय्यद अलीमोद्दीन (रा. राहुलनगर) याला छावणी पोलिसांनी अटक केल्याचे सहायक निरीक्षक विवेक जाधव यांनी सांगितले. चालकास आधीच अटक झालेली आहे.
४ जूनला पहाटे वाळूजला जाण्यासाठी जयराम रिक्षात बसले होते. मात्र, पैशांवरून वाद झाल्याच्या किरकोळ कारणावरून मुजम्मिलने जयरामवर चाकूहल्ला केला. उपचारादरम्यान जयराम यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर रिक्षा व्यवसायातील वाढते गुन्हेगारांचे प्रमाण, शस्त्र बाळगून प्रवाशांच्या वाहतुकीसह प्रवाशांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला.
मुजम्मिलवर कल्याण रेल्वे स्थानक पोलिस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल आहे. तो सतत चाकू बाळगून, नशेतच रिक्षा चालवत होता. विशेष म्हणजे, त्याच्याकडे वाहन परवानाही नव्हता. हल्ल्यानंतर मुजम्मिल जयराम यांचा मोबाइलही घेऊन गेला. त्यामुळे त्याची गुन्हेगारी वृत्ती निष्पन्न झाली. भाड्याने रिक्षा देताना मालक कुठलीही शहानिशा न करता कोणालाही रिक्षा देतात. परिणामी, गुन्हेगारांचे या व्यवसायात प्रमाण वाढले. ‘लोकमत’ने ही बाब वृत्तमालिकेद्वारे समोर आणल्यानंतर पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी अशा बेजबाबदार मालकांवर कठोर कारवाईचे आदेश दिले.
शनिवारी सहायक निरीक्षक विवेक जाधव यांच्या सूचनेवरुन उपनिरीक्षक संजय रोकडे, अंमलदार सिध्दार्थ थोरात, रवींद्र देशमुख, कैलास सोरमारे यांनी रिक्षामालक सय्यद मझरोद्दीनला अटक केली. मझरोद्दीनने दोन महिन्यांपूर्वीच मुजम्मिलला १२ तासांसाठी २५० रुपयांवर रिक्षा चालवण्यास दिली हाेती.
गैरकृत्यास मालकही जबाबदार
चालकाकडून महिला प्रवाशांसोबत गैरवर्तन, मद्यपान करून रिक्षा चालवल्यास, लुटमार, मारहाणीचे कृत्य झाल्यास रिक्षामालकही तेवढेच जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई होईल, असे पोलिसांनी सांगितले.