वडोद बाजार : येथील गिरजा नदीवरील कोल्हापुरी बंधारा व पूल असून, या पुलावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी या पुलावरील स्लॅबमध्ये असलेल्या लोखंडी सळ्या उघड्या पडल्या आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे या पुलाचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
वाहन चालकांना वाहन घेऊन जाताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. या पुलावरील खड्डे चुकवित दुचाकी चालवावी लागत आहे.
वडोद बाजार येथील गिरजा नदीवर १९९८ साली पूल बांधला गेला. या पुलावर वाहनांची कायमच वर्दळ असते; परंतु या पुलाची दुरवस्था झालेली आहे. यात नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या पुलाच्या स्लॅॅबमध्ये असलेल्या लोखंडी सळ्या उघड्या पडल्या आहेत. तेवीस वर्ष उलटले असून या पुलाच्या दुरुस्ती साठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी कोणतीही दखल घेतली नाही. बांधकाम विभागाच्या उदासीनतेमुळे मागील तीन वर्षापूर्वी
तत्कालीन सरपंच छायाबाई भिवसने यांनी ग्रामपंचायतच्या माध्यमातून पुलावरील खड्डे काँक्रिट करून बुजविले आहेत; मात्र पुन्हा मोठमोठे खड्डे पडले असून, सध्याचे उपसरपंच गोपाळ वाघ यांनी या खड्ड्यात खडीचा कच टाकून खड्डे बुजविले होते; मात्र परत सततच्या पावसामुळे खड्ड्यातील कच वाहून गेला आहे. तर खड्डे उघडे पडले आहेत.