सुखद ! 'औरंगाबाद-अहमदनगर-पुणे' रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2020 13:02 IST2020-11-12T13:01:29+5:302020-11-12T13:02:16+5:30
औरंगाबाद-चाळीसगाव, रोटेगाव-कोपरगाव मार्ग अद्यापही सर्वेक्षणात

सुखद ! 'औरंगाबाद-अहमदनगर-पुणे' रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण
औरंगाबाद : महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हल्पमेंट कार्पोरेशन लि. (एमआरआयडीसी) कडून औरंगाबाद-अहमदनगर-पुणेरेल्वे मार्ग तयार करण्याच्या दृष्टीने सर्वेक्षण केले जात आहे. सर्वेक्षण पूण झाल्यांनंतर त्याचा डीपीआर मंजूरीसाठी रेल्वे बोर्डाला सादर केला जाणार आहे.
औरंगाबाद-अहमदनगर-पुणे मार्गासह औरंगाबाद-दौलताबाद-चाळीसगाव आणि रोटेगाव-कोपरगाव मार्गाचेही सर्वेक्षण केले जात आहे. सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर या दोन मार्गाचाही डीपीआर तयार करून मंजूरीसाठी रेल्वे बोर्ड आणि महाराष्ट्र शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. मराठवाडा रेल्वे कृती समितीचे अध्यक्ष अनंत बोरकर यांना एमआरआयडीसीने एका पत्राद्वारे ही माहिती दिली आहे. रोटेगाव-कोपरगाव या मार्गाची गेल्या २५ वर्षांपासून प्रतीक्षा केली जात आहे. पूर्वी रोटगाव-पुणतांबा या मार्गाची मागणी केली जात होती. परंतु या मार्गात गोदावरी नदी येते. त्यामुळे रोटेगाव-कोपरगाव अशा ३५ कि.मी. मार्गाचा पर्याय मांडण्यात आला. त्यास मंजूरीही मिळाली. परंतु हा मार्ग सर्वेक्षणाच्या पुढे जात नसल्याची स्थिती आहे. औरंगाबाद-चाळीसगाव मार्गाचीही नूसती प्रतीक्षा करावी लागत आहे.
पुण्याचा प्रवास होणार कमी वेळेत
औरंगाबाद-पुणे रेल्वे मार्ग झाल्यास कमी वेळेत प्रवास करणे शक्य होईल. सर्वेक्षणातच हा मार्ग शक्य आहे की नाही, हे स्पष्ट होणार आहे. औरंगाबादहून पुण्याला शिक्षण, नोकरी , व्यवसायानिमित्त जाणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. परंतु प्रत्यक्ष हा मार्ग होण्यासाठी किती वर्षांची प्रतीक्षा करावी लागेल, असा प्रश्न प्रवाशांकडून विचारला जात आहे.