गोपीनाथ मुंडेंच्या स्मृतिदिनी पंकजा-धनंजय मुंडे ११ वर्षांनंतर एकत्र; गोपीनाथगडावर भावनिक क्षण
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 18:36 IST2025-06-03T18:36:05+5:302025-06-03T18:36:53+5:30
"गोपीनाथ मुंडे आज असते, तर देशाच्या मोठ्या पदावर असते"; पंकजा मुंडेंचे भावनिक भाषण

गोपीनाथ मुंडेंच्या स्मृतिदिनी पंकजा-धनंजय मुंडे ११ वर्षांनंतर एकत्र; गोपीनाथगडावर भावनिक क्षण
परळी (जि. बीड): भारतीय जनता पक्षाचे दिवंगत नेते आणि महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील ‘लोकनेते’ गोपीनाथ मुंडे यांच्या ११व्या स्मृतिदिनानिमित्त परळी येथील गोपीनाथगडावर आयोजित कार्यक्रमाने राजकीय आणि सामाजिक वर्तुळाचे लक्ष वेधून घेतले. विशेषतः मुंडे कुटुंबातील दोन महत्वाचे चेहरे पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे दोघे तब्बल ११ वर्षांनंतर गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिदिनास एकत्र मंचावर आले. या कार्यक्रमात दोघांनीही हजेरी लावल्याने एक भावनिक क्षण अनुभवण्यास मिळाला. कार्यक्रमाच्या शेवटी बहीण-भाऊ ताटालाताट लावून जेवण करत होते. हे चित्र पाहून उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये आश्चर्य, आनंद व आशेचे वातावरण निर्माण झाले.
कार्यक्रमात बोलताना भाजप नेत्या पंकजा मुंडे म्हणाल्या, "धनंजय यांनी मला सांगितले, ‘आमच्यावतीने तूच बोल’, म्हणून आज मी तुमच्याशी संवाद साधत आहे." त्यांनी पुढे सांगितले की, "मी एकटी नाही, माझ्या पाठीशी तुम्ही सगळे उभे आहात. ही एक कुटुंब व्यवस्था आहे. दरवर्षी आम्ही कार्यक्रम करतो, पण प्रत्येक वेळी वाटतं की आणखी काहीतरी करावं." रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर अशा सामाजिक उपक्रमांद्वारे गोपीनाथ मुंडेंचे विचार आणि कार्य पुढे नेण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत, असं त्यांनी स्पष्ट केलं. "त्यांना जर रक्त लागलं असतं, तर आपण कमी पडलो नसतो. म्हणूनच आजही आम्ही लोकांसाठी रक्तदान करत आहोत," असे त्यांनी सांगितले.
"ते आज असते, तर देशाच्या मोठ्या पदावर असते"
आपल्या भाषणात पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ मुंडेंच्या कार्याचा पुनःस्मरण करत त्यांच्याविषयी आदर व्यक्त केला. "मुंडे साहेब आज असते, तर देशाच्या मोठ्या पदावर असते, त्यांनी फार मोठं स्वप्न पाहिलं होतं आणि ते प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांची धडपड होती," असे त्यांनी स्पष्ट केले. "तुम्ही त्यांना शोधता कुठे, मला माहीत नाही; पण मी त्यांना तुमच्यामध्ये शोधते," अशा शब्दांत त्यांनी उपस्थित जनतेशी आत्मीयतेने संवाद साधला.
पंकजा-धनंजय एकत्र जेवण
तसेच बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, पांडवांना आणि रामाला देखील वनवास सहन करावा लागला होता, जया अंगी मोठेपणा तया यातना कठीण असे कीर्तनात ऐकले, असंही पुढे पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. कार्यक्रमाच्या शेवटी पंकजा मुंडे यांनी उपस्थित सर्व लोकांना "दोन घास खाऊनच जा" असे सांगून जेवणासाठी आग्रह केला. विशेष म्हणजे, यावेळी पंकजा आणि धनंजय मुंडे यांनी एकाच पंगतीत एकत्र जेवण केले. हा प्रसंग अनेक कार्यकर्त्यांना भावूक करणारा होता.
धनंजय मुंडे मात्र मुकच
राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे या कार्यक्रमात उपस्थित होते. मात्र, त्यांनी भाषण न करता मौन राखले. मागील काही दिवसांपासून मुंडे हे निकटवर्तीय वाल्मीक कराडमुळे अडचणीत आले आहेत. त्यामुळे त्यांना मंत्रीपदाचा राजीनामाही द्यावा लागला. नुकतेच ते विपश्यना केंद्रात ध्यानधारणेसाठी जाऊन आले आहेत. त्यानंतर प्रथमच ते सार्वजनिक कार्यक्रमात दिसून आले. त्यामुळे त्यांच्या या संयमित भूमिकेवरही राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत.