बंबाट नगर ते बीड बायपास रस्त्याचे फक्त आश्वासन, चिखलवाटा तुडवण्याशिवाय पर्याय नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 19:10 IST2025-05-29T19:09:51+5:302025-05-29T19:10:53+5:30
हक्काचा रस्ता कधी मिळणार? अशा चिखलवाटा तुडवण्याशिवाय पर्याय राहिला नाही

बंबाट नगर ते बीड बायपास रस्त्याचे फक्त आश्वासन, चिखलवाटा तुडवण्याशिवाय पर्याय नाही
छत्रपती संभाजीनगर: बंबाट नगर व बीड बायपास परिसरातील मुख्य रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. नागरिकांना ‘फक्त आश्वासनांची’च मिळकत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्यांच्या दुरवस्थेचा सामना करत असलेल्या स्थानिक रहिवाशांना प्रत्यक्षात चिखलमुक्त रस्ता कधी मिळणार? असा प्रश्न आता उभा राहिला आहे.
२ वर्षांपूर्वी तत्कालीन आयुक्तांनी रस्त्यांची पाहणी केली होती. तत्पूर्वी आमदार हरिभाऊ बागडे यांच्या निधीतून रस्त्यांचे काम मंजूर झाल्याचेही सांगण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात रस्त्यांचे काम सुरूच झालेले नाही. सध्या नवनिर्वाचित आमदार अनुराधा चव्हाण यांच्याकडे नागरिक रस्त्यांच्या मागणीसाठी सातत्याने धाव घेत आहेत. पावसामुळे ठिकठिकाणी खड्डे, चिखल, पाण्याचे डबके यामुळे शाळकरी विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांचे हाल होत आहेत. अनेक वेळा दुचाकीस्वारांचे अपघात झाले आहेत.
नागरिकांचा आरोप आहे की, प्रशासन केवळ कर गोळा करण्यावरच लक्ष केंद्रित करत आहे. प्रत्यक्ष सुविधा देण्याकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. प्रत्येक निवडणुकीआधी रस्ते मंजूर झाल्याचे सांगितले जाते, मात्र वर्षानुवर्षे रस्त्यांची अवस्था तीच आहे.