जुना वाद, जातीय तेढ आणि अखेर जीवघेणा हल्ला; युवकाच्या मृत्यूनंतर नातेवाईक आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 13:55 IST2025-05-30T13:48:55+5:302025-05-30T13:55:02+5:30
जुन्या वादाचे पर्यवसन युवकाच्या खूनात; शेकडो नागरिकांची पोलिस ठाण्यात धाव

जुना वाद, जातीय तेढ आणि अखेर जीवघेणा हल्ला; युवकाच्या मृत्यूनंतर नातेवाईक आक्रमक
वाळूज महानगर : रांजणगाव शेणपुंजी येथील एकतानगर परिसरात मागील पाच महिन्यांपासून सुरु असलेला वाद अखेर रक्तरंजित ठरला. सोमवारी २६ मे रोजी रात्री साडेआठच्या सुमारास जातीवाचक शिवीगाळ करत एका तरुणाला झालेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याने परिसरात मोठा तणाव निर्माण झाला. खून केल्यानंतरही गुन्हा दाखल होत नसल्याने शेकडो संतप्त नागरिकांनी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्याकडे धाव घेतली. अखेर पोलिसांनी आरोपीविरुद्ध खुनासह ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे.
एकनाथ महादू मोटे (वय ६५) यांनी फिर्यादीत सांगितले की, त्यांचा मुलगा सुनील, शेजारील गोविंद भिसे यांच्यासह आपण घरासमोर बसलेलो होतो. त्यावेळी आशपाक शेख अचानक तेथे आला व सुनीलची गचांडी धरून त्याच्यासह गोविंद यास शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्याचवेळी आशपाकने 'तुझे तो मैं अभी खत्म कर दूंगा', असे म्हणत सुनीलला जातीवाचक शिवीगाळ करत हातातील कड्याने व लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. गोविंद भिसेलाही त्याने कटरने हातावर वार करत जखमी केले. या धक्कादायक हल्ल्यामुळे सुनील जमिनीवर कोसळला. घरातील सगुणाबाई मोटे, सून रेखा तसेच शेजारी संघराज काळे यांच्या मदतीने त्याला वाचवण्यात आले.
घटनेनंतर आरोपी आशपाक हा गोविंद भिसे यांच्या घरी गेला. मात्र, तेथील महिलांनी प्रतिकार केल्याने तो तेथूनही पळून गेला. मारहाणीमुळे सुनील यास छाती व पोटात तीव्र वेदना होऊ लागल्या. त्यानंतर दोन दिवसांपासून तो अन्न न घेता अंथरुणावरच पडून होता. बुधवारी २८ मे रोजी सकाळी तब्येत खालावल्याने त्याला जोगेश्वरी येथील खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी तातडीने घाटी रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. मात्र, घाटीतील डॉक्टरांनी तपासणीअंती सुनीलला मृत घोषित केले. पोलिसांनी आशपाक शेख याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.
पाच महिन्यांपासून सुरू होता वाद
फिर्यादी एकनाथ मोटे हे पत्नी, मुलगा व सून यांच्यासह एकतानगरमध्ये राहतात. त्यांच्या शेजारी इद्रिस पठाण यांचे घर असून, त्यांच्या बकऱ्यांमुळे घरासमोर घाण होत असल्यामुळे वाद निर्माण झाला होता. याच कारणावरून इद्रिस पठाण यांचा नातलग आशपाक शेख याने मागील काही महिन्यांपासून मोटे कुटुंबाशी वाद घालण्यास सुरुवात केली होती. त्याने सुनीलला वेळोवेळी धमक्या दिल्या होत्या.
घटनेनंतर मृत्यूकडे वाटचाल
सुनीलला त्या रात्री छातीत व पोटात दुखू लागले. त्याने काहीच खाल्ले नाही. दोन दिवसांपर्यंत तो अंथरुणावरच पडून होता. २८ मे रोजी सकाळी त्याची तब्येत अधिक खालावली. पत्नी सगुनाबाई यांनी त्याला जोगेश्वरी येथील हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी परिस्थिती पाहून तत्काळ घाटी रुग्णालयात पाठवले. तेथे पोहोचताच डॉक्टरांनी सुनीलला मृत घोषित केले.
पोलिस ठाण्यात संतप्त नागरिकांचा जमाव
परिसरात या घटनेची माहिती पसरताच एकतानगर येथील नागरिकांनी मोठ्या संख्येने एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याकडे धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा दाखल करावा आणि आरोपीवर तत्काळ कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांनी केली. यावेळी शेकडो नागरिकांनी पोलिस ठाण्यात ठिय्या दिला. वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करत आश्वासन दिले की, आरोपीवर कठोर कारवाई केली जाईल.