चित्र पालटले, आता बोटावर मोजावेत एवढेच पोलिस अधिकारी पैसे घेत नाहीत: मीरा बोरवणकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2024 11:50 IST2024-12-09T11:49:19+5:302024-12-09T11:50:31+5:30
मीरा बोरवणकर यांना अनंत भालेराव स्मृती पुरस्कार प्रदान

चित्र पालटले, आता बोटावर मोजावेत एवढेच पोलिस अधिकारी पैसे घेत नाहीत: मीरा बोरवणकर
छत्रपती संभाजीनगर : जेव्हा मी तरुण आयपीएस अधिकारी होते, तेव्हा बोटावर मोजता येतील एवढेच पोलिस अधिकारी पैसे घेत होते. आता मात्र बोटावर मोजावे एवढेच लोक पैसे घेत नाहीत, अशी परिस्थिती आहे. या परिस्थितीला राजकारणी आणि जनता जबाबदार असल्याचे निवृत्त पोलिस महासंचालक डॉ. मीरा बोरवणकर-चड्डा म्हणाल्या. मराठवाडा साहित्य परिषदेच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात रविवारी अनंत भालेराव प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा यंदाचा अनंत भालेराव स्मृती पुरस्कार डॉ. मीरा बोरवणकर यांना निवृत्त न्या. सुनील देशमुख यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
मंचावर डॉ. सविता पानट, मंगेश पानट, हेमंत मिरखेलकर आणि संजीव कुलकर्णी यांची उपस्थिती होती. सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ आणि रोख ५० हजार रु. असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. ‘पोलिस, राज्यकर्ते; आव्हाने आणि समाज’ या विषयावर बोरवणकर यांचे व्याख्यान झाले.
त्या म्हणाल्या की, प्रत्येकाची निष्ठा ही संविधानाप्रति ठेवणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री, गृहमंत्री, पालकमंत्री यांच्यापेक्षा संविधानाची ताकद मोठी आहे. पोलिस ट्रेनिंग सेंटर, यशदा आणि महाविद्यालयात हे शिकवायला हवे. तरुणपणी महिला आहे, म्हणून मला पोलिस अधीक्षकपदी नेमणूक दिली जात नव्हती. आपल्यासोबतचे अन्य अधिकारी अधीक्षक होऊन तीन ते चार वर्षे झाली होती. तेव्हा आपण भांडून पोलिस अधीक्षकपदाची पोस्टिंग मागितली तेव्हा मला छत्रपती संभाजीनगर शहर मिळाले.
आंतरराष्ट्रीय मानकानुसार १ लाख नागरिकांमागे २२० पोलिस असावेत. पण महाराष्ट्रात १६० पोलिस आहेत. तर अन्य राज्यांतील हा आकडा १५३ आहे. १० लाख लोकसंख्येमागे ५० न्यायाधीश असायला हवेत. पण आपल्याकडे केवळ २० आहेत. प्रत्येक राज्यात पोलिसांची २० टक्के पदे रिक्त असतात. यामुळेच ही यंत्रणा बदलणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. आपला समाज पोलिसांनी कायद्यानुसार वागावे, अशी अपेक्षा ठेवतो आणि दुसरीकडे मात्र बदलापूरसारख्या घटनेतील आरोपीला गोळ्या घातल्यानंतर त्यांचे कौतुकही करतो. न्या. देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक संजीव कुलकर्णी यांनी तर संचालन नीता पानसरे यांनी केले.
पुरस्काराची रक्कम पोलिस फाउंडेशनला
पुरस्काराचे ५० हजार रुपये पोलिस फाउंडेशनला देत असल्याची व पुरस्कार महाराष्ट्र पोलिसांना समर्पित करीत असल्याची घोषणा बोरवणकर यांनी केली.