जवळगावकरांचा ‘गड’ कठीणच !
By Admin | Updated: June 13, 2014 00:37 IST2014-06-13T00:16:23+5:302014-06-13T00:37:04+5:30
सुनील चौरे , हदगाव हदगाव-हिमायतनगर विधानसभा मतदारसंघात तुल्यबळ उमेदवारांमुळे काँग्रेसचे विद्यमान आ. माधवराव पाटील जवळगावकर यांना विधानसभेचा गड यंदा कठीणच असल्याचे दिसते.

जवळगावकरांचा ‘गड’ कठीणच !
सुनील चौरे , हदगाव
हदगाव-हिमायतनगर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे असलेले आव्हान, इतर तुल्यबळ उमेदवारांमुळे काँग्रेसचे विद्यमान आ. माधवराव पाटील जवळगावकर यांना विधानसभेचा गड यंदा कठीणच असल्याचे चित्र प्रथमदर्शनी दिसते.
काँग्रेसचा आमदार असतानाही लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराला मिळालेले २२०० मताधिक्य सध्या येथे चर्चेचा विषय बनले आहे. हिंगोली लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राजीव सातव यांनी निवडणूक लढविली. सातव यांना मताधिक्य देण्यात आ. जवळगावकर कमी पडले. विशेष म्हणजे २००९ च्या विधानसभा निवडणुकीत आ. जवळगावकर हे जवळपास ५० हजारांच्या मताधिक्याने विजयी झाले होेते. ही जादू लोकसभा निवडणुकीत दिसून आली नाही. परिणामी केंद्रात बदललेली सत्ता आणि विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य मतदारांशी आमदारांची तसेच काँग्रेस पक्षाची तुटलेली नाळ चर्चेत आहे. दुसऱ्या बाजुला काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अंग झटकून आतापासूनच कामाला सुरुवात केली तर त्याचा पक्षाला लाभ मिळू शकतो, अशीही शक्यता जाणकारांतून व्यक्त होत आहे.
काँग्रेस आमदाराची पाच वर्षांची कामगिरी चांगली आहे. रस्ते, सिंचन, पाणी योजना यासाठी लागणारा आवश्यक निधी मतदारसंघात खेचून आणण्यात यश आले. हदगाव शहरवासियांना फिल्टरचे पाणी देतो म्हणून आमदारांच्या नेतृत्वाखाली पालिकेची सत्ता काबीज केली. हा प्रकल्प मात्र अद्यापही पूर्ण झाला नाही.
शिवसेनेने या मतदारसंघात २००९ पूर्वी सलग १५ वर्ष सत्ता उपभोगली. २००९ मध्ये मात्र काँग्रेसला यश मिळाले. तेव्हा जवळगाकर यांची पाटी कोरी होती.
२०१४ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेकडून माजी आमदार बापूराव पाटील आष्टीकर यांचे चिरंजीव नागेश पाटील आष्टीकर रिंगणात उतरण्याची चिन्हे आहेत. त्यांचीही पाटी कोरी आहे. त्यांना साथ मिळेल ती माजी आमदार व खासदार सुभाष वानखेडे यांची. बापूराव पाटील आष्टीेकर सलग दहा वर्षे आमदार होते. तेही येथे विसरता येणार नाही.
हदगाव तालुक्याचे राजकारण आतापर्यतच्या इतिहासात तीन-चार घरांतच फिरले आहे. आष्टीकर, सूर्यकांता पाटील, बाबूराव पाथरडकर, वानखेडे व माधवराव पाटील जवळगावकर. या मतदारसंघात जेव्हा-जेव्हा इतर मागास उमेदवार जड झाला तेव्हा-तेव्हा सर्व पाटलांनी एकत्र येत त्याला पाडण्याचे काम केले. १९९५ मध्ये शिवसेनेचे सुभाष वानखेडे हे सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आले. यंदाच्या निवडणुकीत जवळगावकर यांच्यासह आष्टीकर, राष्ट्रवादीच्या माजीमंत्री सूर्यकांता पाटील या रिंगणात उतरण्याची चिन्हे, मनसेचे सुरेश सारडा यांनीही तयारी चालविली आहे.
सूर्यकांता पाटील यांची कारकिर्द पाहता त्या विजयी होतील की नाही, हे सांगणे कठीण आहे. परंतु कोणाला निवडून आणायचे हे त्या ठरवू शकतात. विधानपरिषदेचा त्यांचा पत्ताही कटला आहे़ त्यामुळे विधानसभेच्या रिंगणात उतरण्यासाठी त्या सर्व शक्ती पणाला लावणार हेही तेवढेच खरे़
२००९ : प्रमुख ३ उमेदवारांची मते
शिवसेनाबाबूराव पाथ्रडकर ५१८०३
अपक्ष सुरेश जाधव २१३७
काँग्रेस माधवराव जवळगावकर ९६५८४
इच्छुकांचे नाव पक्ष
माधव जवळगावकर काँग्रेस
नागेश आष्टीकर शिवसेना
सूर्यकांता पाटील अपक्ष
सुरेश सारडा मनसे