काँग्रेस-उद्धवसेनेचे फाटले! उद्धव ठाकरेंनी 'मविआ'च्या शक्यतांना दिला पूर्ण विराम, पवारांच्या राष्ट्रवादीबद्दल काय बोलले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 13:43 IST2025-12-24T13:40:00+5:302025-12-24T13:43:26+5:30
Shiv Sena UBT Congress BMC ELection 2026: मनसे आणि उद्धवसेना यांची युती झाली. नव्या राजकीय समीकरणांबरोबर एक प्रश्नही निकाली निकाला तो म्हणजे उद्धवसेना आणि काँग्रेस एकत्र लढणार नाही.

काँग्रेस-उद्धवसेनेचे फाटले! उद्धव ठाकरेंनी 'मविआ'च्या शक्यतांना दिला पूर्ण विराम, पवारांच्या राष्ट्रवादीबद्दल काय बोलले?
BMC Election 2026: मुंबई महापालिका निवडणुकीसह राज्यातील इतर काही महापालिकांमध्ये आता मनसे-उद्धवसेना एकजुटीने उतरणार आहेत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन यांची घोषणा केली. याचवेळी मुंबई महापालिकेत काँग्रेस-उद्धवसेनेचे फाटल्याचेही स्पष्ट झाले. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीबद्दल (शरद पवार) विचारलेल्या प्रश्नावर स्पष्ट भूमिका मांडली.
'ठाकरे बंधूंची युती होत असतानाच महाविकास आघाडीमध्ये फूट पडलेली आहे. काँग्रेस स्वबळावर लढणार आहे आणि जे भाजपला हवे आहे, तेच होताना दिसत आहे', असा मुद्दा माध्यमांच्या प्रतिनिधींनी ठाकरेंसमोर उपस्थित केला.
उद्धव ठाकरे म्हणाले, "भाजपला काय हवे आहे, ते भाजपने पाहावे. मराठी माणसाला काय हवे, ते आम्ही पाहत आहोत."
पवारांच्या राष्ट्रवादीसोबत चर्चा सुरू
राष्ट्रवादी (शरद पवार) काँग्रेसबद्दलही ठाकरेंना प्रश्न विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले, "चर्चा सुरू आहे. बघू... आम्ही आज आमची युती जाहीर केली आहे. शिवसेना आणि मनसे. जे जे महाराष्ट्र प्रेमी आहेत, त्यात भाजपमधील अस्सल मराठी आहेत, तेही येऊ शकतात. ही महाराष्ट्र प्रेमींची युती आहे. ते भाजपमध्येही आहेत."
काँग्रेससोबतच्या आघाडीबद्दल ठाकरे म्हणाले, "काँग्रेसने तर जाहीर केले आहे. ते बोलले आहेत. मग आणखी काय बोलायचं. मला बाकी कोण काय म्हणत आहे, त्याच्याशी कर्तव्य नाही. सगळे पक्ष बाहेर पडून आघाडी अबाधित आहे", असा चिमटा ठाकरेंनी काँग्रेसला लगावला.
उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका
या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे म्हणाले, "दिल्लीत बसलेल्यांचे मनसुबे अनेक आहेत. आता आपण भांडत राहिलो तर त्यांना फायदा होईल. मी मागे म्हटले होते की, एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठी. तुटू नका, फुटू नका, मराठीचा वसा टाकू नका. मराठी माणूस कोणाच्या वाट्याला जात नाही आणि कुणी त्याच्या वाट्याला गेला तर त्याला सोडत नाही", असे ठाकरे म्हणाले.