मोमोज पडले तब्बल वीस लाखांना; खाण्याच्या नादात गाडी ‘अनलॉक’, बॅग चोरांकडून लंपास

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 19:56 IST2025-06-30T19:54:55+5:302025-06-30T19:56:54+5:30

हॉटेलमधून बाहेर आल्यानंतर गाडीमधील बॅग गायब असल्याचे लक्षात आले.

Momos cost as much as 20 lakh rupees; Car 'unlocked' in the middle of eating, bag snatched by thieves | मोमोज पडले तब्बल वीस लाखांना; खाण्याच्या नादात गाडी ‘अनलॉक’, बॅग चोरांकडून लंपास

मोमोज पडले तब्बल वीस लाखांना; खाण्याच्या नादात गाडी ‘अनलॉक’, बॅग चोरांकडून लंपास

छत्रपती संभाजीनगर : कारचा दरवाजा लॉक न करताच मोमोज खाण्यासाठी गेलेले इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे कर्मचारी चोरट्यांच्या जाळ्यात सापडले. चोरट्यांनी कारमधून २० लाख रुपये रोख रक्कम क्षणार्धात लंपास केली. ही घटना २६ जून रोजी सायंकाळी सहा वाजता हडकोच्या डी मार्ट मॉलसमोर घडली. याप्रकरणी २८ जून रोजी सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वऱ्हालबाबू सत्यम कुरपुरोल हे मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीत अकाउंटंट आहेत. २६ जून रोजी सायंकाळी त्यांना प्रकल्प समन्वयक आनंदराव यांनी कंपनीची २० लाखांची रोख जालन्याच्या कार्यालयात पोहोचविण्याची जबाबदारी दिली होती. पैसे घेऊन वऱ्हालबाबू दोन सहकाऱ्यांसह व चालकासह पैठण गेट परिसरात खरेदीसाठी गेले. त्यानंतर दिल्ली गेट मार्गे हर्सूल टी पॉइंटच्या दिशेने गाडी निघाली. दरम्यान, भूक लागल्याने त्यांनी चालकाला डी मार्टसमोरील मोमोज हॉटेलजवळ गाडी थांबविण्यास सांगितले.

लॉक लावण्याचा विसर?
मोमोज खाण्यासाठी हॉटेलमध्ये जाताना वऱ्हालबाबूंनी २० लाख रुपये रोख रक्कम असलेली बॅग कारमध्येच ठेवली होती. हॉटेलमधून बाहेर आल्यानंतर त्यांना बॅग गायब असल्याचे लक्षात आले. त्यांच्या दाव्यानुसार, चालकाने गाडीचे दरवाजे लॉक केले नव्हते. हॉटेलचालकाने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, पैशांची बॅग घेऊन जाणाऱ्या व्यक्तीने पांढरा शर्ट व टोपी परिधान केली होती. या प्रकरणाचा पुढील तपास सिटी चौक पोलिस ठाण्याच्या निरीक्षक निर्मला परदेशी करीत आहेत.

Web Title: Momos cost as much as 20 lakh rupees; Car 'unlocked' in the middle of eating, bag snatched by thieves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.