औरंगाबाद : विद्यार्थ्यांना खेळायला मोबाईल तर हवाय. पण त्यावरच्या त्या दररोजच्या लिंक, व्हाट्सॲप ग्रुममध्ये पाठवावा लागणारा गृहपाठ. त्या रोजच्या मॅसेज, गुगल मीटचा कंटाळा आला आहे. त्यामुळे सर्वंच विद्यार्थ्यांत शाळेत जाण्याची उत्सुकता दिसून येत असुन, पालकांत मात्र, काहीशी भीती असल्याने संमतीपत्राला द्विधा मनस्थिती असल्याने विद्यार्थ्यांत आई मला शाळेला जायचंय असा हट्ट करण्याची वेळ आली आहे.
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पाचवी ते आठवी तर शहरात सहावी ते आठवीचे वर्ग सुरु बुधवारपासून सुरु होताहेत. केंद्रनिहाय बैठका घेवून शहरी भागातील ४४१ शाळांत ६ वी ते ८ वीचे वर्ग सुरु करण्याची सर्व तयारी झाली आहे. शिक्षकांच्या तपासण्या, निर्जंतुकीकरणासंदर्भातही सूचना दिल्या आहे, असे मनपा शिक्षणाधिकारी रामनाथ थोरे म्हणाले.
ग्रामीणमध्ये १ हजार ७७७ शाळेत पाचवी ते आठवीचे वर्ग सुरु करत आहोत. त्यात २ लाख ७५ हजार १०५ विद्यार्थी शिकतात. २७ जानेवारीपासून त्यांचे नियमित वर्ग सुरु होतील. त्यापूर्वी आरटीपीसीआर टेस्ट, कोरोना संदर्भात घ्यावयाची सर्व सूचना शाळांना दिल्या आहेत. विद्यार्थी वर्गात येण्यापूर्वी पालकांचे संमतीपत्र देखील अनिवार्य करण्यात आले आहे. सर्व मुख्याध्यापकांकडून शाळेची तयारी आणि शिक्षकांच्या तपासणची माहीती आॅनलाईन संकलीत करत आहोत. असे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी सूरजप्रसाद जयस्वाल यांनी सांगितले.
----
जिल्ह्यातील पाचवी ते आठवी विद्यार्थी संख्या
पाचवी - ८७,८६९
सहावी - ८६, २०७
सातवी- ८५, ०४४
आठवी- ७९,६३३
---
वर्ग सुरु करण्याची तयारी
जिल्ह्यातील २२१८ शाळांत ३ लाख ३८ हजार ७५३ विद्यार्थी पाचवी ते आठवी वर्गात शिकतात. त्यासाठी ७ हजार ६२३ शिक्षक आहेत. या शिक्षकांना आरटीपीसीआर कोरोना तपासणी २५ जानेवारीपर्यंत अनिवार्य करण्यात आली होती. बहुतांश शिक्षकांच्या तपासण्या झाल्या असुन शाळांनीही वर्ग सुरु करण्याची तयारी पुर्ण केली आहे. जिल्ह्यात पाचवी ते आठवी वर्ग सुरु होताना केवळ शहरात पाचवीचे वर्ग सुरु होणार नाही, असे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डाॅ. बी. बी. चव्हाण यांनी सांगितले.
----
विद्यार्थी काय देताहेत कारणे
-खुप दिवसांपासून घरी असल्याने खुप कंटाळलो आहोत.
-आॅनलाईनपेक्षा वर्गात शिकण्याची इच्छा आहे
- आॅनलाईनमधुन शिकलेले फारसे कळत नाही
- एका मोबाईलवर दोन भावंडांना अडजेस्ट होत नाही
- खूप दिवस झाले मित्रांना भेटलो नाही शाळेत भेट होईल
-शाळा सोडून सर्व सुरु आहे मग वर्गात जायला काय हरकत
-चार विषयांव्यतीरितक्त इतर विषयांची तयारी होईल
-इतिहास भुगोल नागरिकशास्त्र हेही महत्वाचे विषय कसे कळणार
-----
घरी राहून राहून कंटाळा आलाय. ऑनलाईन ग्रुप मध्ये आलेल्या लिंक आणि व्हीडीओ पाहून जमेल ते शिकलो. शाळेत आता शिक्षक प्रत्यक्ष शिकवणार त्यातून काहीतरी डोक्यात उतरेल. मित्रही खूप दिवसांनी भेटतील. शाळेत मजा येईल.
-ज्ञानेश्वर भिसे, आठवीचा विद्यार्थी, भोईवाडा
---
कधी शाळा सुरु होतेय आणि शाळेत जातेय असे झाले होते. आजच संमंतीपत्र भरुन दिले शाळेत. बुधवारी सर्व मैत्रीणी एकत्र वर्गात भेटतील. गणित विज्ञान आॅनलाईनमध्ये कळत नव्हते. तेही सरांकडून प्रत्यक्ष समजून घेता येईल.
-वैष्णवी कोलते, सातवीची विद्यार्थीनी, भालगांव
--
आजुबाजुला सर्व सुरुच झाले आहे. मग शाळेत जायला काय अडचण. आई कोरोनामुळे नाही म्हणते. पण, काळजी घेतल्यावर काही होणार नाही. मी आईना तयार करेल संमतीपत्र द्यायला. घरी किती दिवस राहायचे आता. कंटाळा आलाय घरी राहून.
- मयुर थोरात, सहावी विद्यार्थी, पदमपुरा,
---
शाळेत जाण्याची इच्छा आहे. सगळीकडे पाचवीचा वर्ग सुरु होतोय. पण आपल्या शहरात नाही. त्यामुळे शाळेतून अद्याप काहीही निरोप आला नाही. त्यामुळे ऑनलाईन वर्ग सुरु राहील बहुतेक. ऑनलाईन कळत नाही म्हणून शिकवणीतून विषय समजुन घेतोय.
-धानिया मिठावाला, पाचवी विद्यार्थीनी, चौहारा